सोशल मीडियावर मानहानिकारक पोस्ट शेअर केल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने मंगळवारी रात्री काँग्रेस आमदाराच्या घरावर हल्ला केला. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. या हिंसाचारामध्ये ६० पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेवर अभिनेता जीशान अय्यूब याने संताप व्यक्त केला आहे. संपूर्ण देश अडाणी लोकांनी भरला आहे का? असा संतप्त सवाल त्याने केला आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: स्वरा भास्करचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा

“आत्ताच मला बंगळुरुमध्ये घडलेल्या त्या धक्कादायक घटनेबद्दल माहिती मिळाली. संपूर्ण देश अडाणी लोकांनी भरला आहे का? पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली गोंधळ घातला. मला नाही माहित फेसबुकवर कुठली पोस्ट केली होती. परंतु अर्धवट माहितीच्या आधारे अशी दंगल करणं गुन्हा आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन जीशान अय्यूब याने बंगळुरुमध्ये घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – Video : मराठीतलं पहिलं देशभक्तीपर रँप साँग पाहिलं ‘का?’

काँग्रेस आमदाराच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन हा सर्व वाद निर्माण झाला. शहरातील डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या हिंसक चकमकी झाल्या. पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. या हिंसाचारामध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह ६० पोलीस जखमी झाले आहेत. बंगळुरुमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. डीजे हाल्ली आणि केजी हाल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. सोशल मीडियावर मानहानीकारक पोस्ट शेअर करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.