छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कपिल शर्मा. कपिल आणि त्याच्या टीमने आजवर प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. तसेच शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार शो आणखी रंजक करतात. काही दिवसांपूर्वी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये महाभारत मालिकेतील कलाकार पाहुणे म्हणून पोहोचले होते. त्यामध्ये नीतीश भारद्वाज, फिरोज खान, गजेंद्र चौहान, पुनीत इस्सर आणि गूफी पटेल यांचा समावेश आहे. पण मुकेश खन्ना यांनी या सर्व कलाकारांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला असून शोमध्ये न जाण्याचे कारण सांगितले आहे.

महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी कपिल शर्मा शो अतिशय वाईट असल्याचे सांगत तेथे जाण्यासाठी नकार दिला होता. ‘आता मला सगळे विचारतायेत की मी कपिल शर्मा सारख्या शोला कसा नकार देऊ शकतो. अनेक मोठे कलाकार देखील या शोमध्ये हजेरी लावतात. जात असतील पण मुकेश खन्ना नाही जाणार’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

त्यानंतर त्यांनी शोमध्ये न जाण्यामागचे कारण देखील सांगितले आहे. ‘कारण असे आहे की कपिल शर्मा शो भलेही संपूर्ण देशात लोकप्रिय असेल. पण मला या पेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. या शोमध्ये डबल अर्थाचे विनोद केले जातात. शोमध्ये पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करायला देतात आणि लोक पोट धरुन हसातात’ या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

‘मी तर शोचा फक्त प्रोमो पाहिला. त्यामध्ये अरुण गोविल जे श्रीरामाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात ते हसताना दिसत होते. ज्यांना देश रामाच्या भूमिकेत पाहत आहे त्यांना तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता. पण माहिती नाही अरुण यांनी काय उत्तर दिले. मी असतो तर कपिलचे तोंड बंद केले असते. म्हणून मी जात नाही’ या आशयाचे ट्विट त्यांनी पुढे केले आहे.