नेहमीच वेगवेगळया मुद्यांवरुन चर्चेत राहणारी आणि वादग्रस्त टि्वट करणारी अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा स्वत:च्या संघर्षाची कहाणी सांगणारे टि्वट केले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपासून, तर कंगना रणौतने कोणाचीही पर्वा न करता अनेक विषयांवर बेधडक टि्वट केले आहेत. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिने आधी बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर बोट ठेवलं आणि अनेकांचा रोष ओढवून घेतला.

त्याच संघर्षातून तिने संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर पंगा घेतला. खारमधल्या तिच्या ऑफिसवर झालेली पालिकेची कारवाई त्याच वादाची परिणीत होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिने नाव घेऊन एकेरी उल्लेख सुद्धा केला. आता देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरुन तिची अनेक सेलिब्रिटींबरोबर शाब्दीक लढाई सुरु आहे.

कंगनावर नेहमीच भाजपाला पूरक, अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप होतो. कंगनाने आता तिचं आयुष्य कसं संघर्षमय होतं, त्यातून ती कशी उभी राहिली, या बद्दल टि्वट केले आहे. “वयाच्या १५ व्या वर्षी मी घर सोडलं. माझ्या संघर्षाच्या काळात वडिलांनी मला मदत करण्यास नकार दिला. मी स्वत:च्या पायावर उभी राहिले. वयाच्या १६ व्या वर्षी अंडरवर्ल्ड माफियाच्या संपर्कात आले. वयाच्या २१ व्या वर्षी मी माझ्या आयुष्यातील सर्व खलनायकांना संपवलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळख बनवली. वांद्रे सारख्या पॉश वसाहतीत स्वत:च्या मालकीचं माझं घरं होतं” असं तिने टि्वटमध्ये म्हटलं आहे.