ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला लवकरच नाना पाटेकर प्रसार माध्यमांसमोर उत्तर देणार आहेत. अशी माहिती राकेश सारंग यांनी आज दिली. तनुश्रीने नानांवर आरोप केल्यानंतर कलाविश्वातील अनेक मंडळी नानांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहेत.

या संबंधित प्रकरणामध्ये गणेश आचार्य, चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांनीही नाना पाटेकरांना साथ दिली, असा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. मात्र आता येत्या ८ ऑक्टोबर रोजी नाना पाटेकर, गणेश आचार्य, सामी सिद्दीकी ही कलाकार मंडळी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेमध्ये ते तनुश्रीने केलेल्या आरोपांची उत्तर देणार आहेत.

दरम्यान, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नाना पहिल्यांदाच या आरोपांविषयी जाहीरपणे आपली बाजू मांडणार आहेत. ‘खरंतर असं खोटं बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल काय बोलावं हेच मला सूचत नाहीये. प्रकाशझोतात येण्यासाठी लोक काय करतील हे सांगू शकत नाही’, असं राकेश सारंग यांनी सांगितलं.  सध्या नानांच्या ‘हाऊसफुल ४’ चं जैसलमेर येथे चित्रीकरण सुरु आहे. त्यामुळे ते याविषयी मौन बाळगून आहे. परंतु मुंबईत परतल्यानंतर ते जाहीरपणे याविषयी बोलणार असल्याचं दिसून येत आहे.