नाना पाटेकर उद्घाटक

सोलापुरात नवव्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ बुधवारी (१६ ऑगस्ट) होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ज्येष्ठ चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते व विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. किलरेस्कर व वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने हा महोत्सव आयोजिला आहे. या महोत्सवासाठी सोलापूर विद्यापीठासह संगमेश्वर महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय व व्हीपीपी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सहयोग लाभणार आहे. या बाबतची माहिती संयोजक हृषीकेश कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाचा विषय ‘नद्या वाचवा-जीवन वाचवा’ असा राहणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्नांवर लोकजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

महोत्सवाच्या उद्घाटन सत्रानंतर डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़संकुलात पर्यावरणावर आधारित चित्र प्रदर्शन सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (१७ ऑगस्ट) ऐतिहासिक शिवमंदिरासह भीमा व सीना नद्यांच्या संगमामुळे प्रसिद्ध ठरलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडलसंगम येथे भेटीचा कार्यक्रम आयोजिला आहे. याच दिवशी डॉ. फडकुले नाटय़संकुलात ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे प्रदर्शन केले जाणार आहे. शुक्रवारी (१८ ऑगस्ट) संगमेश्वर महाविद्यालयात प्रश्नमंजूषा, तर डॉ. निर्मलकुमार फडकुले नाटय़संकुलात पर्यावरणविषयक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

शनिवारी (१९ ऑगस्ट) वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हय़ातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक साखर कारखान्याचे सादरीकरण केले जाणार आहे. याशिवाय अन्य महाविद्यालयांमध्ये पथनाटय़ स्पर्धाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात २० महाविद्यालये व १० शाळांमध्ये जलसंवर्धन व पक्षी निरीक्षणावर आधारित उपक्रम राबवले जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

या चित्रपट महोत्सवाचे औचित्य साधून प्रसारमाध्यमे व पर्यावरण या विषयावर पीएच.डी. केलेले पत्रकार समीर इनामदार यांच्यासह पर्यावरणाच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी घडविणारे अकलूजचे डॉ. अरविंद कुंभार, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ भतगुणकी आदींना वसुंधरा पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. प्राचार्य श्रीनिवास वडगबाळकर, सुभेदार बाबुराव पेठकर, प्रा. नरेंद्र काटीकर आदी उपस्थित होते.