मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नेहा पेंडसे नेहमीच बेधडकपणे तिची मतं मांडते. जानेवारी महिन्यात तिने शार्दुल सिंह बयासशी लग्नगाठ बांधली. मात्र तिच्या लग्नाबाबत नंतर सोशल मीडियावर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या शार्दुल सिंह बयास याच्याशी लग्न का केलं असे प्रश्न नेहाला विचारण्यात आले. या ट्रोलर्सना नेहाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, “लग्नानंतर मला खूप वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. सत्य परिस्थिती माहित नसताना लोकं टिका करतात, याचं खूप वाईट वाटतं. ट्रोल करणाऱ्यांच्या आयुष्यात काहीच उरलेलं नसतं म्हणून ते दुसऱ्यांवर टीका करून खूश होतात, असं मला वाटतं. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी इतके ट्रोल झाले नव्हते. मी तर बिग बॉस शोमधूनपण क्लिन चीट घेऊन बाहेर पडले होते. पण आता मला या ट्रोलिंगचा काही फरक पडत नाही.”

या मुलाखतीतन नेहाने लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा खुलासा केला. “लग्नापूर्वी मी व शार्दुल लिव्ह-इनमध्ये राहत होतो हे फार कमी जणांना ठाऊक आहे. दोघांच्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टी एकमेकांना कळाव्यात, समजाव्यात हा लिव्ह-इनमध्ये राहण्यामागचा उद्देश होता. त्यामुळे आता मला त्याच्या त्रासदायक सवयीसुद्धा माहित आहेत”, असं ती म्हणाली.