अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांनी रियावर टीका केली. अशातच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाने रियाला पाठिंबा दिल्याचे कळताच कंगनाने अप्रत्यक्षपणे त्याला सुनावले. आता नेटकऱ्यांनी आयुषमानचा याच्याशी काही संबंध नाही असे म्हणत कंगनाला सुनावले आहे.

कंगनाने कमाल आर खानने केलेल्या ट्विटवर उत्तर दिले. ‘चापलूस आउटसायडर्स केवळ एका कारणाने माफिया लोकांना पाठिंबा देत आहेत आणि ते कारण म्हणजे त्यांची विचार करण्याची सामान्य पद्धत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणीही धमकावत नाही. त्यामुळे ते या गोष्टीचा फायदा घेत कंगना आणि सुशांतसारख्या लोकांची खुलेआमपणे खिल्ली उडवतात.’ कंगनाने ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे आयुषमानवर निशाणा साधला आहे.

त्यावर नेटकरी संतापले असून त्यांनी कंगनाला चांगलेच सुनावले आहे. एका यूजरने तर या सर्वापासून आयुषमानला लांब ठेवा, तो खूप चांगला अभिनेता आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने आमचा तुझ्यावरचा विश्वास उडला आहे असे म्हटले आहे.

काय होते कमाल आर खानचे ट्विट?
“आयुषमानने रिया चक्रवर्ती आणि घराणेशाहीला पाठिंबा देण्यामागे तीन कारणे आहेत. एक – त्याला बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे आहे. दोन – तो यशराज फिल्म कंपनीसोबत काम करतोय. तीन – सुशांत त्याचा प्रतिस्पर्धी होता. चिंता करुन नकोस खुराना तुझे नवे चित्रपट येतायत. तुला प्रेक्षक चांगलाच धडा शिकवतील. ऑल द बेस्ट.” या आशयाचे ट्विट करुन केआरकेने आयुषमान विरोधात आपला संताप व्यक्त केला आहे.

सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर त्याने घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली होती असे म्हटले जात होते. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी स्टारकिड्सवर निशाणा देखील साधला होता. दरम्यान कंगना रणौतने या सर्व चर्चांना दुजोरा देत स्टार किड्सवर निशाणा साधला होता. पण आता कंगनाने आयुषमानचे नाव घेताच नेटकरी तिच्यावर संतापले असल्याचे दिसत आहे.