रवींद्र पाथरे

‘अलबत्या गलबत्या’ या पुनरुज्जीवित बालनाटय़ाचं लहान-थोर प्रेक्षकांकडून उत्तम स्वागत झाल्यापासून नव्याने बालनाटय़ांची लाट आलीय की काय असा प्रश्न पडावा अशी सध्या स्थिती आहे. कारण त्यापाठोपाठ ‘निम्माशिम्मा राक्षस’ आणि ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ ही बालनाटय़ं मंचित झाली आहेत आणि त्यांचंही स्वागत होत आहे. मात्र, यानिमित्ताने काही प्रश्न पडू पाहताहेत : ४०-४५ वर्षांपूर्वीची बालनाटय़ं आजही यशस्वी होताना दिसतात, ती नेमकी कशामुळे? खरं तर आजच्या स्मार्ट बालप्रेक्षकांची मानसिकता लक्षात घेऊन रचलेली, त्यांच्या कल्पनाशक्तीच्या झेपेला रुचणारी बालनाटय़ं का निर्माण होत नाहीयेत? तशी सुपरमॅन, बॅटमन, हॅरी पॉटर, डोरेमॉन, शिनचॅन वगैरे मंडळी ही आजच्या बच्चेकंपनीची पसंतीची. त्यांच्यापैकी बेतलेली सुमार बालनाटय़ं सुट्टीच्या काळात येतातही; परंतु त्यांच्यात आजची मुलं फारशी रमत नाहीत. कदाचित त्या बालनाटय़ांची कमअस्सलता त्यांना रुचत नसावी. मात्र, याच मंडळींना छोटय़ा व मोठय़ा पडद्यावर पाहायला मुलांना फार आवडतं. या पाश्र्वभूमीवर सत्तर-ऐंशी सालातली मराठी बालनाटय़ं मात्र आजची पिढी आवर्जून पाहते आहे. त्यांचा आनंद लुटते आहे. हे नेमकं काय गौडबंगाल आहे? त्या बालनाटय़ांतलं निरागस भाबडेपण, सुष्ट-दुष्टांतला संघर्ष, सत्याचा होणारा विजय या एरव्ही त्यांच्या अनुभवात नसलेल्या गोष्टी त्यांना पाहायला मिळतात म्हणून? की आजच्या सुपरफास्ट जगातील तंत्राधिष्ठित स्मार्टनेसचा त्यांना कंटाळा आलाय म्हणून? की माहिती विस्फोटाच्या या युगात प्रपाताप्रमाणे अंगावर कोसळणाऱ्या अगणित गोष्टींपासून दूर जात, एका आगळ्या काल्पनिक विश्वात नेणाऱ्या जुन्या बालनाटय़ांतले राजा-राणी, राजपुत्र, राजकन्या, पऱ्या, चेटकीण, पंचतंत्र, अकबर-बिरबल, विक्रम-वेताळ, सिंदबादचं अद्भुत विश्व त्यांना अधिक आकर्षित करीत असावं? भोवतालच्या वास्तवापासून दूर जाण्याची निकड त्यांना जाणवत असावी का? या साऱ्याचा एकदा गांभीर्यानं धांडोळा घ्यायला हवा. त्याचबरोबर हे जे काही घडतं आहे लहान मुलांच्या बाबतीत- ते उचित की अनुचित, याचादेखील! कारण त्यांच्या आई-वडलांची, आजी-आजोबांची पिढी ज्या अद्भुतरम्यतेवर पोसली गेली, तीच याही पिढीला भुरळ घालते आहे, हे थोडंसं चमत्कारिक आहे. (पालकपिढीच्या दृष्टीने ते सुखावणारं असलं, तरीही!) या पिढीची म्हणून काहीएक नवी संवेदना असेल की नाही? त्या संवेदनेचं काय? की अशी काही संवेदनाच पिढीगणिक उत्क्रांत झालेली नाही? असो. असे काही प्रश्न यानिमित्ताने पडताहेत. त्यांची उत्तरं विचारीजनांनी शोधायला हवीत.

Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट

तर.. ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’!

बालनाटय़ांच्या पुनरुज्जीवनाचे कर्तेकरविते (पक्षी : दिग्दर्शक) चिन्मय मांडलेकर यांनीच हे नवं बालनाटय़ लिहिलं व दिग्दर्शित केलेलं आहे. त्यांनी तत्पूर्वी केलेल्या बालनाटय़ांची छाया त्यावर स्पष्टपणे दिसून येते.

एका आटपाट नगरीतील राजाची कन्या मुनमुन बारा वर्षांची झाल्याने तो चिंतातुर झालेला आहे. याचं कारण एका चेटकिणीने ती बारा वर्षांची झाली की मी तिला पळवून नेईन अशी शापवाणी उच्चारली आहे. त्यामुळे राजाने राजकन्येला महालाबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. तिच्या अवतीभवती रक्षक नेमले आहेत. परंतु या जाचक बंदिवासाने राजकन्या मुनमुन कावली आहे. तिला बाहेर जाऊन मनसोक्त खेळा-बागडायचं आहे. मात्र, राजाच्या सक्त आदेशामुळे वाडय़ातले नोकरचाकर तिला बाहेर पडू द्यायला राजी नाहीत. ते तिचं मनोरंजन करू पाहतात. रिझवू पाहतात. मात्र, ते काही मुनमुनच्या मनास येत नाही. ती शेवटी पिताश्रींना बजावते की, मला आवडणारी आणि कधीही न संपणारी गोष्ट सांगणारा कुणीतरी आणा, तरच मी वाडय़ात राहीन. अन्यथा सरळ बाहेर खेळायला जाईन.

राजकन्येला न संपणारी कथा सांगणारा माणूस शोधण्यासाठी राजा राज्यात दवंडी पिटवतो. अनेक जण आपला हुन्नर दाखवून राजकन्येचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांच्यापैकी कुणीही राजकन्येला प्रभावित करू शकत नाहीत.

झंपक सर्कशीत अप्पू नावाचा एक बडबडय़ा विदूषक असतो. तो सतत एकातून दुसरी, त्यातून तिसरी, मग चौथी अशा गोष्टी सांगून सर्वाना रिझवीत असे. त्याच दरम्यान सर्कशीत एक नवा कडक रिंगमास्टर खडकेश्वर येऊ घातलेला असतो. त्यामुळे सर्कशीतल्या  सर्वाची पाचावर धारण बसलेली असते. मात्र, अप्पूला त्याने काहीच फरक पडत नाही. म्हणून मग विदूषक अप्पूला ताळ्यावर आणण्याकरता खडकेश्वर त्याच्या प्राणप्रिय हत्तीलाच ओलीस ठेवतो आणि त्याची सुटका करण्याच्या बदल्यात राजकन्या मुनमुनला न संपणारी गोष्ट सांगण्यासाठी पाठवतो. खडकेश्वर हा त्या चेटकिणीचा मुलगा असतो. अप्पूकरवी राजकन्येला पळवून आणून त्याला आपल्या आईचा पण पूर्ण करायचा असतो.

अर्थात पुढे काय घडतं, हे प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य ठरेल.

लेखक-दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ रचताना त्यात चित्रविचित्र, नमुनेदार व्यक्ती योजून मुलांचं पुरेपूर रंजन होईल याची खबरदारी घेतली आहे. नाटकाची गोष्ट तशी साधी व परिचित असली तरी त्यातल्या माणसांच्या वागण्या-बोलण्याने, चमत्कारिक वर्तनाने मुलांना खिळवून ठेवतानाच गोष्ट कशी रंजकतेने पुढे सरकेल हे मांडलेकर यांनी पाहिलं आहे. सर्कशीतील बुटका, लंबूटांग तसंच काडीपैलवान कलावंत, बडबडय़ा विदूषक, धांदरट राजा, त्याचा तितकाच अर्धवट प्रधान अशांचा मेळा त्यांनी भरवला आहे. तसंच राजकन्या मुनमुनची चुणचुणीत जुळी बहीण चुनचुन हिच्या साहसी वृत्तीची जोड दिली आहे. शेवटी विदूषक अप्पूच्या करामतींनी खडकेश्वरचा अंत होतो आणि राजकन्या मुनमुनवरचं संकट टळतं.

‘कापूसकोंडय़ा’च्या सादरीकरणात अनेक रंजक क्लृप्त्या योजून चिन्मय मांडलेकरांनी ही गोष्ट पेश केली आहे. चित्रविचित्र माणसं, धमाल नाचगाणी, हास्यस्फोटक मंचीय व्यवहार (बिझनेस), रंगबेरंगी पेहेराव, अद्भुतरम्य माहोल, स्टेजवर येणारा भलामोठ्ठा हत्ती या सगळ्यामुळे फार गुंतागुंत नसलेल्या या कथेत मुलं छान रमतात. सर्व कलावंतांची बहारदार कामं ही या बालनाटय़ाची जमेची बाजू. एकेकाळी ‘बज्जरबट्टू’ या बालनाटय़ामध्ये चमकलेले अतुल परचुरे मोठय़ा खंडानंतर या बालनाटय़ात पुन्हा अवतरले आहेत, हीसुद्धा या नाटकाची एक विशेषता.

यातली लहान मुलांना रिझवणारी नाचगाणी (गाणी : चिन्मय मांडलेकर, नृत्ये : सोनिया परचुरे) मस्तच आहेत. मयुरेश माडगांवकर यांनी बालांची आवड लक्षात घेऊन दिलेलं संगीत श्रवणीय. नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी राजमहाल, झंपक सर्कसचा तंबू आणि जंगलातील खडकेश्वरची गुहा यथार्थ उभी केली आहे. अमोघ फडकेंनी प्रसंगांतील मूम्ड्सनुसार प्रकाशयोजना केली आहे. गीता गोडबोले (वेशभूषा) आणि उल्लेश खंदारे (रंगभूषा) यांनी नाटकाच्या वास्तवदर्शी मूल्यांत भर घातली आहे.

अतुल परचुरे यांनी सतत बडबड करणारा, समोरच्याचं रंजन करण्यासाठी धडपडणारा, माणुसकी व सकारात्मकतेचं वरदान लाभलेला, हॅपी गो लकी विदूषक अप्पू हसतखेळत साकारला आहे. आपल्या अस्तित्वानं भोवतालचं वातावरण चैतन्यपूर्ण करण्याची त्यांची वृत्ती इथे कामी आली आहे. मैथिली पटवर्धन या चुणचुणीत अन् लोभस मुलीने राजकन्या मुनुमन व चुनचुन या जुळ्या मुलींची भूमिका त्यांच्या स्वभावातल्या फरकासह गोड वठवली आहे. तुषार खेडेकर (राजा), सुनील शिंदे (खडकेश्वर व बंदुल खान), अमित चव्हाण (प्रधान व फज्जासिंग), प्रज्योत शिंदे (म्हमद्या व दवंडीवाला), संकेत मडवी (दिपू), प्रवीण गायकवाड (रिकामे), प्रथमेश जाधव (जग्लर) या सर्वच कलाकारांनी धमाल कामं केली आहेत.