बॉलिवूडमधील घराणेशाही, गटबाजीचा वाद एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आपल्या दमदार अभिनय कौशल्यासाठी ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी यांनी इंडस्ट्रीबाबत वेगळं मत मांडलं. घराणेशाहीचा मला कधीच कोणत्या प्रकारचा त्रास झाला नसल्याचं ते म्हणाले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी माझ्या अभिनय कौशल्यावर काम करत होतो. इंडस्ट्रीमध्ये मला कधीच असहज वाटलं नाही असं मी म्हटल्यावर कदाचित लोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल. पण हा प्रवास आणि अनुभव माझा आहे, त्यामुळे आतापर्यंत तो कसा होता हे मीच सांगू शकतो. माझ्या वाट्यालासुद्धा संघर्ष आला, हे सत्य आहे. चित्रपटातील भूमिका मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली. लोकांनी मला ओळखण्यापूर्वी आठ वर्षे मी संघर्ष केला.”

स्टारकिड्सविषयी ते पुढे म्हणाले, “मला तसा अनुभव आला नसला तरी, इंडस्ट्रीत इतरांसोबत त्या गोष्टी झाल्या नाहीत असं मी म्हणणार नाही. इतरांपेक्षा स्टारकिड्सना लवकर संधी मिळते कारण ते विशिष्ट कुटुंबातून आलेले असतात. मला कधीच सहजतेने संधी मिळाली नाही. पण मला कोणी थांबवलंसुद्धा नाही. तुम्ही आठ वर्षांनी मोठे कलाकार व्हा किंवा आठ दिवसांनी, जर तुमच्याकडे प्रतिभा नसेल तर तुम्ही या इंडस्ट्रीत टिकू शकत नाही. प्रेक्षक खूप सुजाण आहे. त्यांना बरोबर माहित असतं की कोण प्रतिभावान आहे आणि कोण नाही.”

‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मसान’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘गुंजन सक्सेना’ यांसारख्या चित्रपटांतून पंकज त्रिपाठींनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.