partu-mpनवी दिल्लीमधील फिल्म डिव्हिजनच्या ऑडिटोरियममध्ये संसदेतील सर्व खासदारांसाठी नुकताच ‘परतु’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ आयोजीत करण्यात आला होता. जगाच्या पाठीवर कुठेही मानवी भावभावना, आपले कुटुंब, आपली माणसे याविषयीची ओढ
सारखीच असते. नात्यांच्या याच ओढीची व ऋणानुबंधाची कहाणी ‘परतु’ या मराठी चित्रपटातून पहायला मिळते. दोन राज्यातील या ऋणानुबंधाची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी यासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी खास पुढाकार घेतला.

महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांचा अनोखा मिलाप या चित्रपटाच्या माध्यमातून सुरेखरित्या दाखवला असून एक चांगला संदेश प्रभावीपणे मांडल्याबद्दल लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी चित्रपटाच्या टीमचे मनापासून कौतुक केले. भविष्यातही अशा
चांगल्या सिनेमांची निर्मिती करावी व त्यासाठी आवश्यक ती सारी मदत संसदेकडून देण्याचं आश्वासनदेखील त्यांनी यावेळी दिलं.

या विशेष खेळाला महाराष्ट्र व राजस्थानचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. एका शोधाच्या निमित्ताने दोन राज्यांमध्ये निर्माण होणारी जवळीक व प्रेमाचा अनोखा संदेश हा चित्रपट देतो. हा संदेश प्रत्येकाला अंतर्मुख करणारा असेल अशी भावना दिग्दर्शक नितीन
अडसूळ यांनी व्यक्त केली.

हरवलेल्या एका मुलाचा सांभाळ करत त्याच्या मात्यापित्यांच्या शोधासाठी एक गरीब शेतकरी आपलं आयुष्य खर्ची करतो. हे दाखवताना महाराष्ट्र व राजस्थान या दोन राज्यांमधील आपलेपणा त्यांच्यात निर्माण झालेलं बंध प्रत्येकाला बरचं काही शिकवणारा आहे.
महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मराठी मातीतल्या एका कथेसाठी हॉलिवूडकरांनी पुढाकार घेत चित्रपटाची निर्मिती करावी ही बाब ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी निश्चितच आनंददायी असून देशाच्या सीमा ओलांडून एका कलाकृतीला मिळालेला हा मान निश्चितच कौतुकास्पद आहे.

पाहा : ‘परतु’ मूव्ही रिव्ह्यू व्हिडिओ

चित्रपटाची कथा क्लार्क मॅकमिलिअन, नितीन अडसूळ व डेरेल कॉक्स यांनी लिहिली असून याचे मराठी संवाद लेखन मयुर देवल यांनी केलं आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून नितीन अडसूळ, सचिन अडसूळ, रुपेश महाजन, डेरेल कॉक्स, क्लार्क मॅकमिलिअन
यांनी जबाबदारी पेलली. संगीत शशांक पोवार यांचं असून पार्श्वसंगीत हॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार ग्रेग सिम्स याचं आहे. चित्रपटात किशोर कदम, स्मिता तांबे, सौरभ गोखले, गायत्री सोहम, अंशुमन विचारे, नवनी परिहार, राजा बुंदेला, रवी भारतीय आणि
बालकलाकार यश पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.