अनेक दिवसांच्या लॉकडाउननंतर सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली खरी मात्र करोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. नियमांचे पालन करून चित्रीकरण करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. मात्र या काळात 'प्रेम पॉइजन पंगा' या झी युवावरील मालिकेतील दोन अतिशय महत्वाच्या पात्रांना करोनामुळे मालिकाच सोडावी लागली आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका 'प्रेम पॉयजन पंगा' या मालिकेतील मालतीची भूमिका साकारणारी इरावती लागू आणि कैलास भोळे यांची भूमिका साकारणारे स्वप्नील राजशेखर, हे यापुढे या मालिकेत दिसणार नाहीत. त्यांनी मालिका का सोडली असा प्रश्न आता अनेकांना पडला असेल. पण काळजी करू नका आपले हे दोन्ही कलाकार अतिशय ठणठणित आणि निरोगी आहेत. आपल्या मालिकेतील लोकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी अतिशय मोठ्या मनाने दोघांनीही हा निर्णय निर्माते महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना कळवला. १३ जुलैपासून 'झी युवा' वाहिनीवरील मालिकांचे नवे भाग प्रदर्शित झाले त्यात प्रेक्षकांना हे दोन्ही कलाकार दिसले नाहीत. कारण हे दोन्ही कलाकार ज्या भागात राहतात, ते करोनाचे हॉटस्पॉट्स घोषित करण्यात आले होते. जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा या भागातून बाहेर पडून, चित्रीकरणात सहभागी होणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या कुटुंबांच्या आणि अर्थातच मालिकेतील टीमच्या आरोग्याकरिता त्यांनी स्वत:हून घेतलेला हा त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. झी युवा वाहिनी आणि कलाकार यांच्या परस्पर सामंजस्यातून हा निर्णय घेतला आहे.