सलमान खान म्हणजे ‘बॉलिवूडचा भाईजान’ आणि अनेक कलाकारांचा या इण्टस्ट्रीतला ‘गॉडफादर’ होय. त्याच्याशी वाकडं घेणं अनेकांना न परवडण्यासारखं त्यामुळे त्याच्या वाकड्यात जाण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. यापूर्वी विवेक ओबेरॉय, हिमेश रेशमिया, अरिजित सिंग यांसारख्यांना सलमानचा वाईट अनुभव आलाय. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणत अनेक बॉलिवूड कलाकार सलमानशी सलोख्यानं वागतात. पण, प्रियांकाच्या हातून एक चूक घडली अन् सलमानच्या हिट् लिस्टवर ती आली. मात्र आता प्रियांका सलमानचा राग घालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. यासाठी तिनं चांगलीच संधी शोधली आहे.

ऐनवेळी ‘भारत’ चित्रपटाला नकार देत तिनं सलमानला डच्चू दिला. त्यामुळे चित्रीकरणाच्या एक आठवडा आधी मुख्य अभिनेत्री शोधण्याची वेळ सलमानवर आली. प्रियांकाचं अव्यवहारिक वागणं सलमानला अजिबात रुचलं नाही. त्यानं जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवली. ‘प्रियांकानं भारत चित्रपटात भूमिका मिळावी यासाठी माझ्या बहिणीला हजारदा फोन केले. काम स्वत:च्या पदरात पाडून घेतलं आणि आता ऐनवेळी तिनं माघार घेतली. कदाचित तिला आपल्या हिंदी इण्डस्ट्रीत कामच करायचं नसेल. आता तिला हॉलिवूड अधिक जवळचं वाटू लागलं आहे’ अशा शब्दात सलमाननं टीका केली. तसेच तिच्यासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय देखील घेतला. मात्र बॉलिवूडमध्ये राहायचं असेल तर सलमानचा राग काही परवडायचा नाही हे प्रियांकालाही कळून चुकलं. त्यामुळे तिनं आता सलमानशी आपले संबध सुधारण्याचं ठरवलं आहे. यासाठी तिला आयती संधी मिळाली आहे.

बॉलिवूडमधल्या सुत्रांच्या माहितीनुसार प्रियांकानं स्वत:च्या लग्नाचं पहिलं आमंत्रण हे सलमानला दिलं आहे. कदाचित लग्नाच्या निमित्तानं सलमानचा राग शांत होईल असं प्रियांकाला वाटत आहे. म्हणूनच लग्नाची पत्रिका घेऊन ती पहिल्यांदा खान कुटुंबियांकडे गेली असल्याचं समजत आहे. पण, सलमाननं तिच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय पक्का केला असल्याची माहिती सलमानच्या जवळच्या व्यक्तीनं एका वृत्तपत्राला दिली आहे. मात्र लग्नाला सलमानची बहिण अर्पिता आणि अल्विरा दोघींही उपस्थित राहतील.

प्रियांका आणि सलमान ‘भारत’ चित्रपटाच्या निमित्तानं १० वर्षांनंतर एकत्र येणार होते. त्यांच्यामध्ये पूर्वीपासून वाद होता. हा वाद मिटवण्यात सलमानची बहिण अर्पितानं पुढाकार घेतला. मात्र प्रियांकाच्या अव्यवहारिक वागण्यामुळे दुखावलेल्या सलमानं कामच काय पण तिच्या लग्नालाही न जाण्याचा निर्णय घेतला आहे.