करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणात लोकांनी सुरक्षित राहावे म्हणून सरकारने लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. लॉकडाउनच्या काळात देशवासीयांनी घरातच राहावे म्हणून ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्णा’ अशा काही गाजलेल्या मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या. या मालिकांच्या निमित्ताने अभिनेता पुनीत इस्सार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. महाभारतमधील भीम विरुद्ध दुर्योधन हा फाईट सीन पाहिला की आजही माझं शरीर काळं निळ पडतं असा आश्चर्यचकित करणारा खुलासा पुनीत इस्सार यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले पुनीत?

पुनीत इस्सार भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी महाभारत या मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारली होती. मालिकेत त्यांनी केलेला अभिनय पाहून हे खरोखरच दुर्योधन आहेत? अशा प्रश्न त्याकाळच्या प्रेक्षकांना पडला होता. या मालिकेच्या निमित्ताने दिलेल्या हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पुनीत म्हणाले, “भीमासोबत केलेली ती फाईटींग आठवली की आजही माझं शरीर काळ निळ पडतं.”

“दुर्योधन हा माझा ड्रिम रोल होता. निर्मात्यांना बलदंड शरीराचा अभिनेता हवा होता. माझं पिळदार शरीर पाहून त्यांनी मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली. या भूमिकेत सर्व काही ठिक होत परंतु भीमासोबत केलेली ती शेवटची फाईट मी कधीही विसरणार नाही. या दृश्याचं चित्रीकरण जवळपास १८ दिवस सुरु होतं. भर उन्हात खांद्यावर वजनदार गधा घेऊन मला उन्हात उभं केलं जायचं. यामुळे माझ्या शरीरावर काळे निळे डाग पडले होते. ती फाईट आठवली की आजही मला माझं शरीर काळं निळं पडल्याचा भास होतो.”

महाभारत ही मालिका आजही सुपरहिट ठरत आहे. रामायण व महाभारत या मालिकांमुळे दुरदर्शनच्या लोकप्रियतेत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच टीव्हीवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांमध्ये सध्या दूरदर्शन क्रमांक एकवर पोहोचले आहे.