डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रोतोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांची आज देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. तो व्हिडीओ पाहून अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू यांचे पूर्ण आयुष्य बदलले. रानू यांना पैसा आणि प्रसिद्धीसोबतच आणखी एक बहुमोलाची भेट मिळाली आहे. त्यांची मुलगी तब्बल १० वर्षांनंतर त्यांना पुन्हा भेटली आहे. परंतु रानू यांना प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्यांची मुलगी परतली असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर रानू यांच्या मुलीने या सर्वावर वक्तव्य करत चर्चांन पूर्णविराम लावला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये रानू यांच्या मुलीने ती आईला सोडून १० वर्षे लांब का राहिली याचा खुलासा केला आहे. रानू यांच्या मुलीचा घस्फोट झाला होता. त्यानंतर तिने कठीण परिस्थितीचा सामना केला असल्याचे तिने सांगितले. वडिलांच्या मृत्यूनंतर रानू या नैराशाच्या शिकार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मुलगीने ८-९ वर्षे त्यांचा सांभळ केला. रानू आणि त्यांच्या मुलीचा १० वर्ष संपर्क नव्हता. तिला अनेकांनी तिच्या आईच्या तब्बेती बद्दल सांगितले. पंरतु स्वत: आयुष्यात अस्थिर असल्यामुळे तिने आईशी संपर्क साधला नाही. आता रानू यांना त्यांच्या सुरेल आवाजामुळे प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांची मुलगी आनंदी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यांच्या मुलीने रानू यांना आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली असल्याचे देखील म्हटले आहे.

हिमेश रेशमियाचा लवकरच ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडल यांनी ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करताचा रानू यांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्या पहिल्यावहिल्या गाण्यासाठी हिमेशने त्यांना जवळपास सहा ते सात लाख रुपये मानधन दिले आहे. मात्र हिमेशने देऊ केलेले हे रानू स्वीकार करत नव्हत्या. मात्र हिमेशने त्यांना अगदी आग्रहाने हे पैसे दिले. इतकच नाही तर हिमेशने त्यांना तुम्ही बॉलिवूडमध्ये नक्की यशस्वी होणार असेही सांगितले.

रानू या मुळच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या. पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. त्या रेल्वेमध्ये गाणे गात कोलकात्याला पोहोचल्या आणि कोलकाताच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपल्या जीवनाचा गाडा चालू लागल्या. तेथे त्यांना अतिंद्र चक्रवर्ती हा तरुण भेटला. पेशाने इंजीनिअर असलेल्या अतिंद्रने रानू यांचा सुरेल आवाज ऐकला आणि त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रानू यांना मुंबईत घेऊन येणारा व्यक्तीसुद्धा हाच आहे. त्यांना गायनाची संधी देणाऱ्या हिमेशचे अतिंद्रने आभार मानले आहेत.