तामिळनाडूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर तेथील राजकारणात निवडणुकीसंबंधी हालचाल वाढू लागल्याचं दिसत आहे. दरम्यान यावेळी अभिनेता रजनीकांत निवडणूक लढवणार का ? अशी चर्चा रंगली आहे. यामागचं कारण म्हणजे तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी चेन्नई येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ठरवत २०२१ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करु शकतात.

तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्षांची नजर सध्या रजनीकांत काय घोषणा करतात याकडे लागली आहे. बैठकीनंतर रजनीकांत निवडणूक लढणार की नाही यासंबंधी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. रजनीकांच यांनी आपण सर्वात आपला पक्ष रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यानंतरच निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांच्या नावे असणारं एक पत्र तामिळनाडूत चर्चेचा विषय ठरलं होतं, यामध्ये डॉक्टरांनी करोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस तसंच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता.

रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा आहे.