रुपेरी पडद्यावर एकाहून एक दमदार कौटुंबिक कहाण्या मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘राजश्री प्रॉडक्शन’ने आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर राजश्रीने ‘हम चार’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपटसुद्धा कौटुंबिक कहाणीवरच आधारित असल्याचं समजतंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक दीक्षित करणार आहे.

‘राजश्री प्रॉडक्शनसाठी काम करणं आणि कुटुंबाची परिभाषा सांगणाऱ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा अनुभव नक्कीच उत्तम असेल. आजच्या काळात अशा प्रकारच्या चित्रपटांची परंपरा राजश्रीने आजवर कायम राखली आहे,’ असं अभिषेक म्हणाले. ‘हम चार’ हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. एकत्र कुटुंबाची संकल्पनाच नाहीशी होत चालली असून या चित्रपटातून त्याचंच महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार झळकणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ असे सुपरहिट चित्रपट राजश्री प्रॉडक्शनने आजवर दिले आहेत. तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाने केवळ तीन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवला होता. राजश्रीच्या बहुतांश चित्रपटांमध्ये सलमान मुख्य भूमिकेत दिसतो. त्यामुळे आता ‘हम चार’मध्ये सलमानचीच वर्णी लागणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.