प्रत्येक सण-उत्सव आणि बॉलिवूड यांचं एक खास नातं आहे. कलाविश्वात प्रत्येक सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या आनंदाच्या क्षणांमध्ये ही सेलिब्रिटी मंडळी चाहत्यांनादेखील सहभागी करुन घेत असतात. त्यामुळे आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपण होळी, रंगपंचमी, दिवाळी, पाडवा किंवा रक्षाबंधन अशा सण-उत्सवांवर आधारित गाणी पाहिली आहेत. आज रक्षाबंधन असल्यामुळे बहीण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारी बॉलिवूडमधीलकाही सदाबहार गाणी पाहू.

१. फुलों का तारों का सबका कहना है-

१९७१ मध्ये आलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातलं हे गाणं असून आजही त्याची तितकीच लोकप्रियता पाहायला मिळते. देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन देव आनंद यांनीच केले होते.

२. बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है…

हे गाणं धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. १९७४ साली आलेल्या रेशम की डोर या चित्रपटातील हे गाणं आहे. शंकर- जयकिशन यांचं संगीत लाभलेलं हे गाणं शैलेंद्र यांनी लिहीलं आहे. तर सुमन कल्याणपुर यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे.

३. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन…

राम माहेश्वरी दिग्दर्शित काजल या चित्रपटातील हे सुप्रसिद्ध गाणं असून या गाण्यात भावा- बहिणीचं अनोखं नातं दाखवण्यात आलं आहे. मीना कुमारी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याला आशा भोसले यांचा सुरेख आवाज लाभला आहे. साहिर लुधियान्वी यांनी हे गाणे लिहिले असून रवी यांनी त्याला संगीत दिले आहे. या गाण्यात मीना कुमारी आपल्या भावाला हे गाणं गाऊन त्याच्यासाठीचं प्रेम व्यक्त करते.

४. भैया मेरे राखी के बंधन को निभाना –

अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे १९७१ मध्ये आलेल्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील आहे. हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आले. यात नंदा आपल्या भावाला म्हणजे बलराज साहनी यांना राखी बांधताना हे गीत म्हणतात. शंकर जयकिशन यांनी या गाण्याला संगीत दिले असून शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिले आहे. तर लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे.

५. ये राखी बंधन है ऐसा –

१९७२ मध्ये आलेल्या ‘बेईमान’ या सिनेमातले रक्षाबंधनचे तेव्हाचे सुपरहिट गाणे होते. शंकर- जयकिशन यांचे संगीत असलेले हे हाणे लता मंगेशकर यांनीच गायले होते. मनोज कुमार, राखी, प्राण, स्नेह लता आणि प्रेमनाथ यांच्या मुख्य भूमिका होत्या.