आदिराच्या जन्मानंतर अनेक महिन्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा सिनेमाकडे वळली आहे. लवकरच ती ‘हिचकी’ या तिच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण करत आहे. या सिनेमाची निर्मिती स्वतः आदित्य चोप्रा करत आहे. पण राणी आदित्यसोबत सिनेमांवर चर्चा करण्यापेक्षा कुटुंबाबद्दल चर्चा करणं अधिक पसंत करते.

नुकत्याच एका कार्यक्रमाला ती गेली असता राणी म्हणाली की, ‘मी आदित्यसोबत कामाबद्दल कधीच बोलत नाही. त्याने मला त्याच्या सिनेमांत घ्यावं असेही मला वाटत नाही. मी फक्त त्याच्यासोबत आमच्या दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल चर्चा करते. आदित्य आणि माझ्यातल्या गप्पा या प्रेम आणि आदिरा यांच्याभोवतीच फिरणाऱ्या असतात. मी आता मोठ्या कुटुंबाचा विचार नाही करु शकत. मला फार आधी याबद्दल विचार करायला हवा होता पण आता वेळ निघून गेली. पण मी दुसऱ्या बाळाचा विचार करु शकते.’

२०१४ मध्ये इटली येथे राणी मुखर्जीने आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते. राणीने आपल्या लग्नात फार कमी लोकांना आमंत्रित केले होते. डिसेंबर २०१५ मध्ये या जोडप्याला कन्यारत्न झाले. त्यांनी आपल्या आद्याक्षरावरुन मुलीचे नाव आदिरा असे ठेवले.

आपल्या आगामी ‘हिचकी’ सिनेमाबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘मुलीसाठी मी दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. मी माझ्या दिग्दर्शकाला म्हणालेही होते की, मी आता सिनेमे करु शकत नाही कारण मी गृहिणी झाले आहे. मला वाटत नाही मला अभिनय जमेल. पण त्यांनी कामाच्या वेळा बदलण्याचाही विचार केला आणि मी सिनेमाला होकार दिला. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा कामाला सुरूवात केली तेव्हा सारं काही सुरळीत पार पडलं. तेव्हा मी मनाशीच म्हटले की, काहीही झालं तरी मी एक अभिनेत्री आहे हे मला कधीही विसरता कामा नये.’