बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आज फक्त भारतीय अभिनेताच नाही तर तो एक ग्लोबल स्टार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमाच्या यशानंतर तर सगळीकडे फक्त रणवीरच्याच नावाचे वारे वाहताना दिसत आहेत. या सिनेमानंतर रणवीरने आपल्या मानधनातही वाढ केली आहे. ‘पद्मावत’ सिनेमात सर्वात जास्त कौतुक कोणाचे झाले असेल तर ते रणवीरने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जी या व्यक्तिरेखेच्या. यादरम्यान रणवीरबाबत एक मोठा खुलासा समोर आला आहे जो ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

रणवीरने ‘बँड बाजा बारात’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ सिनेमात काम केले. या दोन्ही सिनेमातील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले. या दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनानंतर सिमी ग्रेवाल यांच्या ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल या टॉक शो’मध्ये रणवीर मुलाखतीसाठी गेला होता. या शोमध्ये सिमी यांनी त्याला कशा मुली आवडतात असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीर म्हणालेला की, त्याला स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणारी, सामान्य ज्ञान असणारी, चांगले कपडे घालणारी आणि आत्मविश्वासाने समोरच्याशी बोलणाऱ्या मुली त्याला आवडतात.

रणवीरच्या या आवडींमुळेच तो दीपिकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहे. दीपिकामध्ये त्याला आवडणारे सर्व गुण असतील असे म्हणायला हरकत नाही. याच शोमध्ये रणवीरने सांगितले की, ‘बँड बाजा बारात’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत असताना सिनेमाच्या दिग्दर्शकाने शुभेच्छांचे अनेक फोन येत असल्याचे सांगितले. पण या शुभेच्छांचा स्वीकार करताना त्याने एक कॉल उचलला नव्हता. तेव्हा दिग्दर्शक मनीष शर्माने त्याला स्वतःचा मोबाइल तपासायला सांगितला. रणवीरच्या मोबाइलवर ५५५ या नंबरचा एक मिस कॉल होता. थोड्यावेळाने मनीषने हा फोन शाहरुखचा असल्याचे सांगितले.

आपण शाहरुखचा फोन उचचला नाही हे जेव्हा रणवीरला कळले तेव्हा त्याला फार वाईट वाटले. पण त्यानंतर थोड्याच वेळात शाहरुख आणि रणवीरचं फोनवर बोलणं झालं. तो क्षण रणवीरसाठी अविस्मरणीय ठरला होता.