बॉलिवूडचा हॉट स्टार अशी ओळख असणाऱ्या रणवीरने एका मुलाखतीत त्याच्या स्ट्रगलच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने त्याचा पहिला पोर्टफोलियो कसा तयार केला याच्या आठवणी सांगितल्या. रणवीर म्हणाला की, फार मेहनतीने एखाद्याने पोर्टफोलियो तयार करावा आणि तो दिग्दर्शक- निर्मात्यांना द्यावा. त्यांनी तो तुमच्यासमोरच कचऱ्याच्या पेटीत टाकावा यासारखं दुसरं दुःख नाही. रणवीर रेस्तरांमध्ये आणि नाइट क्लबमध्ये जाऊन फिल्ममेकरचा पाठलाग करायचा. एवढंच नाही तर तो लोकांच्या मोबाइलमधून नंबरही चोरायचा. या मिळवलेल्या नंबरवरून तो फिल्ममेकर्सना काम देण्यासाठी फोन करायचा.

स्वतःचा पोर्टफोलियो घेऊन रणवीर सगळीकडे फिरायचा आणि त्याचा पोर्टफोलियो कोणाला तरी आवडेल आणि तो दिग्दर्शक किंवा निर्माता त्याला फोन करेल या आशेनेच तो स्वतःचे कार्ड वाटायचा. ८ ते १० महिन्यांनंतर यशराज फिल्म्सकडून शानूचा फोन आला. बँड बाजा बारात सिनेमासाठी ते नवीन मुलाच्या शोधात होते. पण याबद्दल जेव्हा रणवीरला कळले तेव्हा तो अधिक चिंताग्रस्त झाला. कारण त्याला माहित होते की यशराज फिल्म्स हा फार मोठा ब्रॅण्ड जो फक्त स्टार कलाकारांसोबतच काम करतं.

रणवीरने सांगितले की, ‘बँड बाता बारात’च्या ऑडिशनसाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर रणवीरने मागे वळून पाहिलेच नाही. पद्मावत सिनेमातील अभिनयामुळे सध्या त्याच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. त्याच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो झोया अख्तरच्या गली बॉय सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो आलिया भट्टसोबत पहिल्यांदा काम करणार आहे.