सोमवारी (२२ जुलै) भारताचं ‘चांद्रयान २’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन ‘चांद्रयान २’चे प्रक्षेपण करण्यात आलं. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे या चांद्रयानाचा आणि बाहुबली या चित्रपटाचा जवळचा संबंध आहे. ‘चांद्रयान २’चे वहन करणाऱ्या रॉकेटला ‘बाहुबली’ हे नाव देण्यात आले. हे रॉकेट अत्यंत भव्य असल्याने हे नाव निवडण्यात आलं आहे. दरम्यान, या रॉकेटला बाहुबली नाव देण्यात आल्यामुळे अभिनेता प्रभासने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे.

“चांद्रयान २चं प्रक्षेपण होणं ही साऱ्यांसाठीच आनंदाची बाब आहे. ‘चांद्रयान २’ चंद्राच्या दिशेने झेपावलं आहे. खरं तर हा बाहुबली चित्रपटाच्या टीमसाठी आनंदाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. ‘चांद्रयान २’चं वहन करणाऱ्या रॉकेटला बाहुबलीचं नाव देण्यात आलं आहे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर हा दिवस आला आहे. या यानामध्ये ३०० टनापेक्षा अधिक वजन नेण्याची क्षमता आहे”, असं ट्विट प्रभासने केलं आहे.

दरम्यान, चांद्रयान २ चे१५ जुलै रोजी प्रक्षेपण होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर २२ जुलै रोजी चंद्रयान २ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. चांद्रयान २ या यानाचा हा सुरुवातीचा काळ आहे. सुरुवातीला रॉकेटचा वेग नियमित असणार आहे असेही इस्त्रोने सांगितले आहे. चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने झेपावल्याने इस्रोने पुन्हा एकदा एक नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान २ ची यात्रा ४५ दिवसांपेक्षा जास्त दिवसांची असणार आहे.