मिमिक्री करण्यावरून सुरुवातीला खूप लोकांनी मला हिणवलं. आयुष्यात एवढंच येतं फक्त तुला, हेच करणार का, अशी टीका केली. पण मला त्याचं गैर वाटलं नाही, कारण कदाचित देवाने मला आवाजाची खास देणगी दिली आहे. जी सर्वांकडेच असते असं नाही, अशा शब्दांत विनोदवीर सागर कारंडेनं उत्तर दिलं. 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'वर त्याने हजेरी लावली आणि या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. सागरच्या मते मिमिक्री म्हणजे काय? "मुळात मिमिक्रीची संकल्पनाच लोकांना समजली नाही. मिमिक्री म्हणजे फक्त दुसऱ्यांचे हुबेहूब आवाज काढणं नाही. मला असं वाटतं या जगात येणारा प्रत्येक माणूस हा मिमिक्री करत असतो. जन्म घेतल्यापासून तो मिमिक्रीच करत असतो. आपण म्हणतो की एखादा मुलगा, मुलगी आईवर गेलाय, वडिलांवर गेलाय.. याचा अर्थ तो आई-वडिलांचं निरीक्षण करत असतो आणि त्यांच्यानुसार वागत असतो. शाळेत असताना आपल्याला पाढे शिकवले जातात. आयुष्यभर आपण पाढे त्याच चालीत बोलतो. ती चाल कधीच बदलण्याचा प्रयत्न आपण करत नाही. यालाच मिमिक्री म्हणतात. आयुष्यभर आपण मिमिक्रीच करत असतो. प्रत्येक कलाकारात हे गुण असतात", असं तो म्हणाला. पाहा त्याची संपूर्ण मुलाखत : या मुलाखतीत त्याने कॉमेडी नट आणि सिरीअस नट असं वर्गीकरण करणं चुकीचं आहे असंही मत मांडलं. "नट हा नटच असतो. नटाने पाण्यासारखं असावं. त्यात कुठलाही रंग टाकला तर तो आत्मसात करता आला पाहिजे," असं तो म्हणाला.