सैफ अली खाननं २०१२ मध्ये करिना कपूरसोबत दुसरं लग्न केलं. या गोष्टीला आता सहा वर्षे उलटली. मात्र करिनाशी लग्नाच्याच दिवशी आपण पूर्वाश्रमीच्या पत्नीला एक भावनिक पत्रंही लिहिलं होतं असं सैफनं नुकतंच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात मान्य केलं केलं आहे. २००४ मध्ये सैफनं पत्नी अमृताशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अमृता आणि सैफ विभक्त राहू लागले.

करण जोहरच्या कार्यक्रमात सैफ आपली मुलगी सारा अली खानसोबत आला होता. यावेळी सैफनं अमृताला पत्र लिहिल्याचं कबुल केलं होतं. अमृताला भावनिक पत्र मी लिहिलं होतं अर्थात आम्ही जो चांगला काळ व्यतित केला त्याबद्दल आणि भविष्याबद्दल हे पत्र होतं. पत्र लिहून झाल्यानंतर मी ते करिनाला दाखवलं होतं. तिनं खूप शांतपणे ते पत्र वाचलं. हे पत्र मी अमृताला पाठवलंच पाहिजे असंही तिनं मला सांगितलं. तिनं मला तेव्हा पांठिबा दिला होता, असं म्हणत सैफनं आतापर्यंत न सांगितलेला अनुभव करणच्या कार्यक्रमातून व्यक्त केला.

या लग्नासाठी सारा खूपच उत्सुक होती असंही सैफ म्हणाला. तिला माझ्या आणि करिनाच्या लग्नाला यायचं होतं पण, काही कारणामुळे ते शक्य होत नव्हतं. अखेर ती लग्नाला गेलीच विशेष म्हणजे खुद्द आईनं तयारीसाठी मदत केली असंही सारा जोड देत म्हणाली. सारा लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तर याच महिन्यात साराचा ‘सिम्बा’ हा दुसरा चित्रपटही प्रदर्शित होत आहे.