माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. खरं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याला श्रद्धांजली वाहिण्यासाठी काही वेळेचं बंधन नसतं. मात्र सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी नक्कीच वेळचं बंधन आहे. त्यामुळेच पाच दिवसांनी अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहणाऱ्या अभिनेता सलमान खानला ट्रोल व्हावं लागलं आहे. सलमान खानने ट्विट करत देशाने एका मोठ्या व्यक्तीला गमावलं असल्याचं म्हटलं आहे. मात्र ट्विटरकरांनी सलमानला ट्रोल करत इतके दिवस झोपला होतास का ? असे प्रश्न विचारले आहेत.

सलमान खानच्या ट्विटवर अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे. इतक्या मोठ्या नेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करण्यासाठी इतके दिवस का लागावेत असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे.

सलमान खानला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आपल्या चित्रपट, ट्विटमुळे तो अनेकदा ट्रोल झाला आहे. नुकतंच ‘रेस ३’ चित्रपटावेळी त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र सलमानने आपल्याला याचा काही फरक पडत नसून ‘रेस ३’ हिट असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान सलमान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियांका चोप्राने चित्रपटातून माघार घेतल्याने सध्या बरीच चर्चा रंगली होती. मात्र यानंतरही चित्रपटाचं शुटिंग थांबवण्यात आलेलं नाही. नुकताच चित्रपटाचा टिझरही रिलीज करण्यात आला होता.