जुन्या हिंदी चित्रपटांचा रिमेक करणं ही गोष्ट बॉलिवूडला नवीन नाही.सलमान खानला स्वतः जुन्या हिंदी चित्रपटाचा रिमेक करण्यात रस नसला तरीही त्याच्या एका जुन्या चित्रपटाचा बॉलिवूडमधील नवीन अभिनेत्यांनी रिमेक करावा अशी त्याची इच्छा आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानला रिमेकबाबत विचारण्यात आले. यावर तो म्हणाला की,”मला सध्यातरी कोणताच रिमेक करायचा नाहीये.पण १९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह’ चित्रपटाचा एखाद्या नवीन अभिनेत्याने रिमेक केला तर मला आवडेल.हा चित्रपट खूप सुंदर आहे असं मला वरूण धवनने देखील सांगितलं होतं”असंही तो म्हणाला.

“माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीला मी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कमाई केली होती पण हा चित्रपट माझ्या फार आवडीचा आहे. त्या चित्रपटात माझी भूमिकाही खूप छान होती.”असं तो म्हणाला. सलमान खानने वरूण धवनचे नाव घेतल्यामुळे कदाचित त्यानेच ही भूमिका साकारावी अशी सलमानची इच्छा असावी.

सलमानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘भारत’ काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ आणि २०१७ साली आलेल्या ‘टायगर जिंदा है’ नंतर सलमान पुन्हा ‘भारत’च्या निमित्ताने दिग्दर्शक अली अब्बास जफरसोबत काम करत आहे.या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद आहे.’भारत’नंतर सलमान ‘दबंग ३’ मध्ये चुलबुल पांडेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सलमान आणि सोनाक्षीची जोडी दिसणार आहे.