छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘भाबीजी घर पर है.’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच मालिकेतील प्रत्येक पात्र हे सतत चर्चेत असते. अनिता भाबी हे पात्र साकारणारी सौम्या टंडन विशेष चर्चेत असते. पण आता अनिता भाबीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने मालिका सोडण्यावर मालिकेच्या निर्मात्या बेनिफर कोहलीने वक्तव्य केले आहे.

नुकताच एका मुलाखतीमध्ये बेनिफर यांनी सौम्या ‘भाबीजी घर पर है’ मालिका सोडत असल्याचे म्हटले आहे. ‘मालिका तर सुरु ठेवायला हवी. सौम्या ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती तिच्या कामात अतिशय हुशार आहे आणि तिच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करु. तिने गेली अनेक वर्षे या मालिकेत भूमिका साकारली आहे आणि आता ती माझी जवळची मैत्रीण आहे’ असे बेनिफर म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला तिची खूप आठवण येईल. तसेच आमच्या दोघींमध्ये चागंले मैत्रीचे नाते असल्यामुळे मी तिला तिच्या जागी मालिकेत कोणती अभिनेत्री भूमिका साकारु शकते असेही विचारले आहे. तिने गेली बरीच वर्षे माझ्यासोबत काम केले त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते.’

गेल्या पाच वर्षांपासून सौम्या भाबीजी घर पर है या मालिकेत भूमिका साकारत आहे. ‘माझ्या आयुष्यातील भाबीजी या मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. कोहली आणि संजय जी हे खूप चांगले निर्माते आहेत. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. मी आणि बेनफिर खूप चांगल्या मैत्रीणी आहोत’ असे सौम्याने मालिकेविषयी बोलताना म्हटले आहे.