छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे ‘ये रिश्ते हैं प्यार के’. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शाहीर शेख आणि रिया शर्मा ही जोडी घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार भावूक झाले असून शाहीर शेखने त्याच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.

“या मालिकेच्या निमित्ताने आम्ही एक चांगली सुरुवात केली होती. इतकी चांगली आणि सकारात्मक विचार करणारी टीम छोट्या पडद्यावर फार क्विचत पाहायला मिळते. आम्ही कायमच एकमेकांसोबत काम करण्यास उत्सुक असायचो. या मालिकेची स्क्रिप्टदेखील चांगली होती. त्यातून अनेक चांगले मेसेज प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. या मालिकेत प्रत्येकाने उत्तम काम केलं त्यामुळे आम्ही नक्कीच एकमेकांना मिस करु”, असं शाहीर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “खरं तर हा शो बंद होणार. मालिका ऑफ एअर जाणार हे समजल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. पण या मालिकेचा शेवट नक्कीच चांगला होईल. आम्हाला प्रेक्षकांना एक चांगला संदेश द्यायचा होता आणि तो देण्यास आम्ही यशस्वी झालो याचं समाधान आम्हाला आहे”.

दरम्यान, ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका कॉलेज जीवनातील तरुण – तरुणीवर आधारित आहे. या मालिकेच शाहीर शेख मुख्य भूमिकेत झळकला आहे. तसंच यापूर्वी त्याने ‘नव्या’, ‘महाभारत’, ‘सलीम अनारकली’ या मालिकांमध्येही काम केलं आहे.