अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या कारकिर्दीच्या शिखावर आहे, असं म्हणायला हरकत नाही. २०१८ मध्ये आतापर्यंत तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून, तिनही चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. समंथा तिच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यातही स्थिरस्थावर झाली असून, आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव घेतलं जात आहे. अभिनेता नागार्जुनच्या मुलासोबत म्हणजेच नाग चैतन्यसोबत समंथा गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकली. पण, तरीही आपला भूतकाळ काही बाबतीत ती विसरु शकलेली नाही.

सध्या समंथा चर्चेत आहे ते म्हणजे तिच्या एका मुलाखतीमुळे. एका तेलुगू दैनिकाशी संवाद साधताना तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरासोबतच्या नात्यावरही वक्तव्य केलं. ‘महंती’ या चित्रपटातील जेमिनी गणेशच्या व्यक्तीरेखेशी तिने पूर्वाश्रमीच्या प्रियकराची तुलना केली.

आपल्या खासगी आयुष्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा करत समंथा म्हणाली, ‘सावित्रीप्रमाणेच मीसुद्धा अशाच कोणत्यातरी संकटात सापडले असते. पण, सुदैवाने मला सुरुवातीला संकटांची चाहूल लागली होती. त्यामुळे मीच त्या नात्यातून काढा पाय घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्यात नाग चैतन्य आला. तो सर्वच बाबतीत माझ्या आयुष्यात एखाद्या रत्नाप्रमाणे झळाळी देऊन गेला.’

‘महंती’ या चित्रपटाच्या निमित्ताने समंथा तिच्या खासगी आयुष्याविषयी खुलेपणाने बोलली. या चित्रपटातून अभिनेता जेमिनी गणेशन यांच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणांवर भाष्य करण्यात आलं होतं. अभिनेत्री सावित्री यांच्यासोबतचं नातं आणि या नात्यामुळे त्यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार या साऱ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. खुद्द समंथाने या चित्रपटाच्या कथानकात आपल्याही खासगी आयुष्याचच प्रतिबिंब पाहात, त्याविषयीचा उलगडा केला.

वाचा : …म्हणून आलिया- रणबीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार नाहीत

समंथाच्या भूतकाळाविषयी सांगावं तर, प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. जवळपास अडीच वर्षे ते दोघंही रिलेशनशिपमध्ये होतं. पण, काही महत्त्वाच्या उदाहरणार्थ लग्नाच्या विषयावर त्यांचं दुमत झाल्यामुळे या दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्याचं म्हटलं गेलं.

समंथा सिद्धार्थसोबत लग्न करण्याचा विचार करतेवेळी सिद्धार्थ मात्र लग्नासाठी तयार नव्हता. शिवाय समंथाविषयी तो बऱ्याच गोष्टींमध्येही प्रमाणापेक्षा जास्त लक्ष द्यायचा. ज्यामुळेच तिने त्याच्यापासून दूर राण्याचा मार्ग निवडला होता.