कलाकाराची आपल्या कलेशी प्रामाणिकता असावी असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने नुकतेच केले. सुबोध भावे याने चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका अशा तीनही माध्यमांत काम केले असून त्यामध्ये त्याने आपल्या अभिनयाची चमक दाखवून दिली आहे. बालगंधर्व, लोकमान्य टिळक, …आणि काशिनाथ घाणेकर या चरित्रपटातील त्याच्या भूमिका आजरामर झाल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावर ‘तुला पाहते रे’ ही सुबोधची मुख्य भूमिका असलेली मालिकाही सध्या जोरदार गाजत आहे.

पुण्यात सिल्वर समोहाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुबोधने त्याचे विचार मांडले. त्यावेळी सिल्व्हर समोहाचे किरण सावंत, संतोष बारणे, सोमनाथ सस्ते, विकास साने आणि आ. महेश दादा लांडगे हे मान्यवर उपस्थित होते. कलाकाराने कोणत्याही चौकटीत न अडकता काम करायला हवे. कलेशी पक्की नाळ जोडण्यासाठी कलाकाराने रंगभूमीशी नाते जोडणे महत्वाचे असून तेथेच कलाकार घडत असतो. त्याचबरोबर मराठी चित्रपटाकडे बघताना मनोरंजनात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे असेही सुबोधने सांगितले. विशिष्ट कलाकृतीतून काय संदेश मिळेल, त्यातून काय शिकायला मिळेल यापेक्षा मनोरंजन म्हणून बघणे महत्त्वाचे आहे. अशाप्रकारची खिलाडीवृत्ती कायम असायला हवी.