लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ‘राजा रानीची गं जोडी,‘जीव झाला येडापिसा’ या मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनु आणि सिद्धार्थची केमिस्ट्री नव्याने अनुभवता येणार आहे.

अलिकडेच या मालिकेच्या नव्या भागांचा प्रोमो प्रदर्शित झाला होता. या प्रोमोमध्ये अनु सिद्धार्थला गोडधोडबरोबर काही चमचमीत, आंबट करायला शिक, असं सांगते. त्यामुळे आता या नव्या भागात अनु आणि सिद्धार्थच्या कोणती तरी नवीन गोड बातमी देणार असं प्रेक्षकांना वाटत आहे.त्यामुळे या नव्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आखून दिलेल्या नियमांचं योग्यरित्या पालन करत सेटवरील चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटायझेशन करण्यात आलं आहे.

“जवळपास चार महिन्यांनंतर मी सेटवर गेलो होतो आणि मालिकेची संपूर्ण टीम माझ्यासमोर होती. परंतु, चार महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर आम्ही भेटतोय असं अजिबात वाटलं नाही. आताच काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून आम्ही परत भेटलोय असंच वाटत होतं.परंतु, मंदार देवस्थळी यांचे लाइट्स, कॅमेरा अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन हे शब्द कानावर पडल्यावर पोटात गोळा आला आणि मालिकेचा पहिला दिवस आठवला”, असं अभिनेता शशांक केतकर म्हणाला.

दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. येत्या २१ जुलैपासून ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.