बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान या रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री स्वरा भास्करने कंगना रणौतवर निशाणा साधला आहे. तू तर सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना? असा उपरोधिक सवाल तिने कंगनाला केला आहे.

अवश्य पाहा – “चाप ओढला अन् कान सुन्न झाले”; ‘मिर्झापूर २’साठी अभिनेत्रीने केली खरीखुरी ‘शुटिंग’

कंगनाने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीला आव्हान दिलं होतं. जर सुशांतने आत्महत्या केली हे सिद्ध झालं तर मी माझा पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करेन असं ती म्हणाली होती. तिच्या याच वक्तव्यावरुन स्वराने तिच्यावर उपरोधित टोला लगावला आहे. “सुशांतने आत्महत्याच केली होती हे आता सीबीआय आणि एम्सच्या रिपोर्टवरुन सिद्ध झालं आहे. कोणीतरी आपला पुरस्कार सरकारला परत देणार होतं ना?” अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने कंगनाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स; किंमत पाहून तुम्हाला येईल चक्कर

एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.