आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याबरोबर आनंदाचे चार क्षण घालविणे ही कुठल्याही चाहत्यासाठी आयुष्यभराची आठवण असू शकते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेला अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. या प्रेमापोटीच या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना एक अमूल्य संधी ‘जगदंब क्रिएशन’ व झी मराठीने उपलब्ध करून दिली होती. या मालिकेवर आधारित एका प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सोशल मिडीयावर करण्यात आले होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील २५ भाग्यवान विजेत्यांनी नुकतीच ‘संभाजी’ मालिकेच्या सेटवर कलाकारांची प्रत्यक्ष भेट घेतली.

‘छत्रपती संभाजी महाराजांच्या’ जयंती निमित्त या भेटीचा योग जुळून आला होता. या २५ भाग्यवान विजेत्यांना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संपूर्ण टीमला प्रत्यक्ष भेटून त्याच्यांशी गप्पागोष्टी करता आल्या. या कलाकारांबरोबर गप्पागोष्टी आणि धम्माल, तसेच विजेत्यांचे मालिकेबद्दलचे मनोगत असा फक्कड कार्यक्रम ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या सेटवर रंगला होता. याप्रसंगी शाहीर संतोष साळुंखे यांच्या पोवाड्याच्या सादरीकरणाने संभाजी महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.