छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तारक मेहता म्हणजे शैलेश लोढा आणि टप्पू म्हणजेच राज अनादकत यांच्यामध्ये वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप जोशी यांनी नुकताच ईटाइम्सला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही १३ वर्षे एकत्र काम करतोय. जेव्हा आमच्यामध्ये वाद झाले अशा चर्चा होतात तेव्हा त्या ऐकून आम्हाला हसू येते. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियावर अशा अफवा पसरवल्या जातात. उगाच अशा खोट्या कथा सांगतात. मला या गोष्टींवर प्रतिक्रिया देखील देण्याची इच्छा नाही.’

पुढे ते म्हणाले, ‘आम्ही एक उत्तम टीम आहोत. त्यामुळेच हा शो सर्वांना इतका आवडत आहे. मी माझे को-स्टार्स आणि संपूर्ण टीमसोबत काम करताना आनंदी असतो. त्यामुळे मी इतर गोष्टींचा विचार करत नाही.’

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील जेठालाल, बबिता, दयाबेन, टप्पू, तारक मेहता, माधवी भाभी, अय्यर हे पात्र कायमच चर्चेत असतात. ही मालिका जवळपास १३ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दयाबेन हे पात्र सकारणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. ती परत कधी येणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.