अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. 'जे दहा वर्षांपूर्वी बोललो तेच खरे आहे. जे सत्य आहे ते कायम सत्यच राहणार,' असे नाना या पत्रकार परिषदेत म्हणाले. २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तनुश्रीने एका मुलाखतीत केला. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळून लावत तिला कायदेशीर नोटीस बजावली होती. 'तनुश्रीला कायदेशीर नोटीस पाठवली असून ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काहीच बोलता येणार नाही. तसेच वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे,' असं ते पुढे म्हणाले. तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात शनिवारी लेखी तक्रार दाखल केली. नाना पाटेकर यांच्यासह कोरिओग्राफर गणेश आचार्य, निर्माता सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचादेखील तक्रारीत उल्लेख आहे. तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपांवर अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांसारख्या बऱ्याच कलाकारांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे. तर काहींनी हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे अशी तनुश्रीवर टीका केली. 'नाना पाटेकर यांना आपण रोखले म्हणून त्यांनी संपूर्ण शूटिंगदरम्यान मला त्रास दिला. नाना इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी शूटिंग संपवून मी घरी निघाले त्यावेळी माझ्या गाडीवर दगडफेक केली. कुटुंबियांना त्रास दिला. मनसेकडून त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती,' असे गंभीर आरोप तनुश्रीने केले आहेत.