पद्मावती या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून डावलण्यात आले. त्यामुळे बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, असा आरोप सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केला. सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटात अनेक महत्त्वपूर्ण बदल सुचवले. या पार्श्वभूमीवर बोलताना पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कारभारावर टीका केली. पद्मावती लोकांनी पाहण्यापूर्वीच चित्रपटाला विरोध सहन करावा लागला. मुळात संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी विरोध करण्यापूर्वीच चित्रपटात बदल सुचवले जाणे अपेक्षित होते. मात्र, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला सातत्याने डावलले. ही भूमिका बोर्डाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. चित्रपटात सुचवण्यात आलेल्या कटसमुळे पद्मावतीच्या निर्मात्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या सगळ्याच्यानिमित्ताने व्होटबँकेचे राजकारण करण्यात आले. चित्रपटाचे प्रदर्शन गुजरातच्या निवडणुकांपर्यंत रोखून धरण्यात आले. यासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांवर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दबाव आणण्यात आला, असा आरोप पहलाज निहलानी यांनी केला.

निहलानी यांचा सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे प्रचंड गाजला होता. परंतु, निहलानी आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले होते. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर निहलानी यांच्या चित्रपटांविषयीच्या बदललेल्या दृष्टीकोनाने अनेकजण चक्रावले होते. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी असताना ‘इंटरकोर्स’ शब्दाला किंवा किसिंग सीनवर आक्षेप घेणाऱ्या निहलानी यांनी पदावरून पायउतार झाल्यानंतर ज्युली-२ या सिनेमाचे वितरक म्हणून काम पाहिले होते.

एकता कपूरमुळे पहलाज निहलानी यांना सोडावं लागलं अध्यक्षपद?