काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले तरी प्रेक्षकांची मनं जिंकून जातात. चित्रपटाची कथा जरी तिकिटबारीवर कमाई करण्यात अयशस्वी ठरली तरी त्यातील कलाकार प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडून जातात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘तमाशा’. रणबीर कपूर व दीपिका पदुकोण यांच्या ब्रेकअपनंतर दिग्दर्शक इम्तियाज अलीने हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला होता. त्यामुळे ब्रेकअपनंतरही त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी रंगते हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. या चित्रपटातील गाणी आणि काही दृश्ये आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या चित्रपटातील काही अविस्मरणीय फोटो व डायलॉग पोस्ट केले आहेत. #4YearsOfTamasha हा हॅशटॅगसुद्धा जोरदार ट्रेण्ड होत आहे. 

या चित्रपटाच्या शेवटच्या दिवशीचे शूटिंग मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये पार पडले. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम भावूक झाली होती. चित्रपटाच्या शूटिंगच्या संपूर्ण प्रवास आठवून त्यावेळी रणबीर व दीपिका पूर्ण युनिटसमोर रडले. हे पाहून सेटवरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण हे दोघे सार्वजनिक ठिकाणी कधीच आपल्या भावना व्यक्त करत नाहीत.

आणखी वाचा : ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाने घेतलं इतक्या कोटींचं घर; पाहा फोटो

ब्रेकअपनंतरही दीपिका-रणबीरने मैत्रीचे नाते कधीच तोडले नाही. दीपिकाचे रणवीर सिंगसोबत लग्न झाले. आजही दीपिका-रणबीर एकमेकांना पार्ट्यांमध्ये आनंदाने भेटतात व कामसुद्धा करतात. रणबीर-दीपिकाच्या नात्याचा शेवट जरी गोड होऊ शकला नसला तरी आजही प्रेक्षकांना ही जोडी ऑनस्क्रीन पाहायला नक्कीच आवडते.