कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत गेल्या सहा वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. येत्या १४ ते १६ डिसेंबरपर्यंत या कार्यक्रमात राजकीय हास्यकारंजे उडणार आहेत. महाराष्ट्रातील तरुण-तडफदार नेतेमंडळी या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार थुकरटवाडीत येणार आहेत.

या भागात ‘पोस्टमन काका’ सागर कारंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या आणि त्यांचं दुःख सांगणारं पत्र सादर केलं आणि ते पत्र ऐकताना रोहित पवारांचे डोळे पाणावले. या पत्राला हे तीनही नेते काय उत्तर देणार हे प्रेक्षकांना कार्यक्रमात पाहायला मिळेल.

आणखी वाचा : “रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो”; ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पंकजांचा टोला

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतील ‘पत्रास कारण की..’ हा भाग लोकांना प्रचंड आवडतो. एखादा विषय किंवा व्यक्ती घेऊन पत्र लिहिलं जातं. त्या पत्राचं वाचन पोस्टमनकाकांच्या भूमिकेतील विनोदवीर सागर कारंडे करतो.

‘चला हवा येऊ द्या’चा हा विशेष भाग सोमवार १४ ते बुधवार १६ डिसेंबर रात्री ९.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.