सोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचा प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या कशी जाधवांची सून बनून येणार आहे आणि त्या पुढे काय काय घडत याची प्रेक्षकांनामध्ये उत्सुकता आहे.
तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सुर्यभानची काळजी घेणारी कोणी तरी घरात यावी असं बायजींना वाटू लागत. दरम्यान घरातच राहणाऱ्या अल्लड पण तेवढ्याच समंजस ऐश्वर्याकडे त्यांचे लक्ष जाते. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो. अनेक वर्ष तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.
View this post on Instagram
सूर्यभानला ३ मुलं आहेत जी ऐश्वर्याच्या वयाची आहेत. आता अल्लड ऐश्वर्या या कुटुंबात सून बनून आणि या मुलांची आई बनून आल्यावर काय काय घडणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाधव कुटुंब हे गावातील मोठं प्रस्थ असल्याने लग्नाचा थाट देखील तसाच असणार आहे.
बायजींच्या पुढाकाराने ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होतं पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरा समोर आणून उभं करते. मालिकेच्या आगामी भागामध्ये अल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.