करोना व्हायरचा वाढता संसर्ग पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. या २१ दिवसांच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला होता. या कठिण काळात प्रेक्षकांच्या मागणीनुसार ८० आणि ९०च्या दशाकातील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. या मालिकांमध्ये ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘शक्तिमान’, ‘देख भाई देख’, ‘सर्कस’, ‘ब्योमकेश बक्षी’, ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकांचा समावेश आहे. या यादीमधील ‘रामायण’ ही मालिका प्रेक्षकांना विशेष आवड असल्याचे दिसत आहे. तसेच रामायणात मंथरा हे पात्र साकारणाऱ्या ललिता पवार यांच्याविषयी किती जणांना माहिती आहे? चला जाणून घेऊया त्यांच्या विषयी. रामायण मालिकेती राम, सीता, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, मथंरा ही पात्र पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण सध्या चर्चेत आहेत त्या म्हणजे मंथरा ही भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री ललिता पवार. पण त्यांच्यासोबत एक अशी घटना घडली की नंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. १९४२ मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’ या सिनेमाच्या सेटवर एका दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान, भगवान दादा यांना ललिता पवार यांच्या कानाखाली मारायची होती. भगवान दादा यांनी जोरात कानाखाली मारली ज्यामुळे त्या खालीच कोसळल्या. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले. त्यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता यांच्यावर तीन वर्ष उपचार सुरु होते. त्या बऱ्या तर झाल्या पण लकव्यामुळे त्यांना डावा डोळा गमवावा लागला. इतकेच नाही तर त्यांचा चेहराही कायमचा बिघडला. डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचे अभिनेत्री होण्याचे स्वप्न कायमचे तुटले. पण चित्रपटसृष्टीत काम करण्याचा एक मार्ग बंद झाला असला तरी ललिता यांनी हार मानली नाही. या अपघातानंतरच चित्रपटसृष्टीला मिळाली बॉलिवूडची सर्वात खाष्ट सासू. ललिता यांनी आपल्या कारकीर्दीत जवळपास ७०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. आणखी वाचा : ‘भरत’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने वयाच्या ४०व्या वर्षी घेतला होता जगाचा निरोप ललिता यांनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या शेकडो भूमिका केल्या. पण त्यांच्या नावाला आणि चेहऱ्याला खरी ओळक नकारात्मक भूमिकांमधूनच मिळत गेली. ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी नाशिकच्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील लक्ष्मणराव सगुण व्यापारी होते. ललिता यांनी गणपतराव पवार यांच्यासोबत लग्न केले होते. मात्र दोघांनी काही वर्षांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर ललिता यांनी निर्माता राजप्रकाश गुप्ता यांच्याशी लग्न केले. ललिता यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली. १९२७ मध्ये आलेल्या पतित उद्धार या मुखपटात त्यांनी पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. ‘श्री ४२९’, ‘अनाडी’, ‘हम दोनों’, ‘आनंद’, ‘नसीब’, ‘दुसरी सीता’, ‘काली घटा’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. १९५९ मध्ये ‘अनाडी’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. १९९० मध्ये ललिता पवार यांना जबड्याचा कर्करोग झाला. यानंतर उपचारांसाठी त्या पुण्याला गेल्या. पण कर्करोगामुळे त्याचे फक्त वजनच कमी झाले नव्हते तर त्यांना स्मृतीभ्रंशही झाला होता. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.