प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर यांची लोकप्रिय ठरलेली नाटके ‘टिळक आणि आगरकर’,’ वाजे पाऊल आपुले’ ही दोन्ही नाटके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन्ही नाटकांनी अनुक्रमे १९६७ आणि १९८० चा काळ गाजवला होता. त्यामुळे या नाटकांची गोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चाखता यावी यासाठी या नाटकांची पुनर्निर्मिती करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
१९६७ मध्ये रंगमंचावर ‘वाजे पाऊले आपुले’ या नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन विश्राम बेडेकर यांनी केलं होतं. विशेष म्हणजे या नाटकाला दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी या कलाकारांच्या अभिनयाचा साज चढला होता. तर ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे या नाटकांचा अनुभव पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेता यावा यासाठी त्यांची पुनरुज्जीवन होत असल्याचं संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव यांनी जाहीर केले.
अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी ‘वाजे पाऊल आपुले’ या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या २४ नोव्हेंबर पासून सर्वत्र सुरु होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे. जुन्या संचात काम केलेले आणि सध्या हयात असलेले एकमेव जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यात त्यांनी तेव्हा केलेली भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करीत असून त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशिलाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोबत अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे गुणी कलावंत आहेत.
विश्राम बेडेकरलिखित ‘टिळक आणि आगरकर’ हे सुमारे तीन दशकांपूर्वी साहित्य संघाने रंगभूमीवर आणलेलं नाटक आज २०१८ मध्ये पुनश्च रंगभूमीवर येत आहे मात्र थोडं वेगळ्या स्वरुपात. त्याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत, त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केले जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेल्या या नाटकाची धूरा आता कौस्तुभ सावकर सांभाळणार आहेत.अभिनेता अक्षय पेंडसे यांच्या निधनानंतर त्यांनी या अभिवाचनाच्या प्रयोगांना पूर्णविराम दिला होता. संघाने वाचिक अभिनयाद्वारे पुन्हा रसिकांना हा अलौकिक आनंद देण्याचे ठरवले असून हे प्रयोग विशेष ठरणार आहेत.
‘टिळक आणि आगरकर’ नाटकाच्या अभिवाचनात सहभाग घेणाऱ्या कलावंतामध्ये गोपाळराव जोशी(उन्मन बाणकर), गोपाळराव आगरकर(अंगद म्हसकर), यशोदा आगरकर(मिथिला मुरकुटे), बळवंतराव टिळक(कौस्तुभ सावरकर) तसेच ‘श्री. नाट्यरंग कर्जत’च्या नवोदित गुणी कलावंतांचाही सहभाग आहे. हे प्रयोग ‘श्री. नाट्यरंग कर्जत’ या संस्थेच्या सहकार्याने सादर होतील.
१९६७ साली ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाचे शेवटचे प्रयोग झाले, त्यानंतर पन्नास वर्षांनी हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचे धाडस आम्ही करीत आहोत. हे नाटक खुसखुशीत संवादाने नटलेले आहे. संशय कल्लोळ या एकमेव नाटकाव्यतिरिक्त संशय या विषयावर दुसरे गोड कौटुंबिक नाटक आलेले नसावे. नटांच्या एरवींच्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा हे नाटक खूप वेगळं आहे. विश्राम बेडेकरांच्या हाताखाली सुमारे अडीच वर्षे त्यांचा सहाय्यक म्हणून काम केल्यामुळे आज हे नाटक बसवताना त्या अनुभवाची खूप मदत झाली असे जयंत सावरकर म्हणाले.