बॉलिवूडमध्ये एकेकाळी गोविंदा आणि करिश्मा कपूर ही जोडी हिट होती. त्या जोडीची सर कोणालाच येणार नाही. पण थोड्याफार प्रमाणात तशी कोणती जोडी आता बॉलिवूडमध्ये असेल तर ती म्हणजे वरुण धवन आणि आलिया भट्ट. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तेसुद्धा गोविंदा-करिश्मा यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमधून.

१९९५ साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा-करिश्माचा ‘कूली नं. १’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय. या चित्रपटाची गाणी, गोविंदा-करिश्माची केमिस्ट्री प्रेक्षकांना फार आवडली होती. आता या चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती वरुणचा भाऊ रोहित धवन करणार असून दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार असल्याचं समजतंय. अर्थात याबद्दलची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

आणखी वाचा : ‘रेडू’नंतर आता ‘रापण’

‘कूली नं. १’च्या रिमेकसाठी आधी सारा अली खानच्या नावाची चर्चा होती. पण आता आलियाचं नाव पक्कं झाल्याचं कळतंय. सध्या वरुण आणि आलिया आगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. त्यानंतर या रिमेकची घोषणा होण्याची शक्यता आहे.