पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. मात्र त्या परिस्थितीमध्येही ते खंबीर आणि तेवढ्याच निडरतेने उभे राहिले, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आणि बालाकोटवर आधारित चित्रपटाची निर्मित करण्यासाठी अनेक निर्माते, दिग्दर्शक पुढे सरसावले आहेत. त्यातच आता अभिनेता विवेक ओबेरॉयला हा चित्रपट करण्यासाठीचे अधिकार मिळाले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयला हवाईदलाकडून या चित्रपटाच्या निर्मितीचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं नाव 'बालाकोट : ट्रु स्टोरी' असं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण रिअल लोकेशनवर करण्यात येणार आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकाणांचा समावेश आहे. #Update: Vivek Oberoi to make a film on #Balakot airstrike. Titled #Balakot: #TheTrueStory. Will be filmed in #Jammu, #Kashmir, #Delhi and #Agra. Will go on floors by the end of the year. Will be made in #Hindi #Tamil #Telugu. — taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2019 दरम्यान, विवेक या चित्रपटाची निर्मिती करणार असून कलाविश्वातील दिग्गज कलाकार यामध्ये मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हवाई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तयार करण्याचा मानस चित्रपटाच्या टीमचा आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण टीम या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेत आहे.