दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या सुपरहिट चित्रपटांमुळे प्रकाशझोतात आलेली जोडी म्हणजे प्रभास आणि अनुष्का शर्मा. बाहुबलीमध्ये एकत्र झळकल्यानंतर या दोघांची सोशल मीडियावर विशेष चर्चा रंगू लागली. अगदी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना तर अक्षरश: उधाण आलं. याविषयी प्रभासने त्याचं मौन सोडलं असून आता प्रभासच्या कुटुंबीयांनीही याविषयी त्यांचं मत मांडलं आहे.

“प्रभासच्या कुटुंबीयांना खासकरुन त्याच्या आई-वडीलांना लव्हमॅरेज ही संकल्पना मान्य नाही. प्रभास आणि अनुष्का या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे आणि ही मैत्री एवढ्यापूरतीच मर्यादित रहावी अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा आहे. या दोघांचं मैत्रीचं नातं अन्य कोणत्या नात्यात परिवर्तित होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. कारण या नात्याला पुढे काही भविष्य नाही. त्यामुळे प्रभासच्या घरातले या नात्याचा कधीच स्वीकार करणार नाहीत”, असं प्रभासच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “विशेष म्हणजे प्रभासदेखील त्याच्या घरातल्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यामुळे घरातल्यांचं मन दुखावलं जाईल असं कोणतंच पाऊल तो उचलणार नाही”.

दरम्यान, २०१५ मध्ये अनुष्काचं लग्न ठरलं होतं. मात्र प्रभासच्या सांगण्यामुळे तिने या लग्नाला नकार दिला. यावेळी ‘बाहुबली’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होतं. त्यामुळे अनुष्काने तिचं लक्ष केवळ चित्रपटाकडे केंद्रीत करावं यासाठी प्रभासने तिला हे सांगितलं होतं. विशेष म्हणजे प्रभासने स्वत: देखील या कालावधीमध्ये लग्न केलं नाही. या काळात त्याला आलेल्या अनेक मुलींची स्थळं त्याने नाकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने या पाच वर्षांमध्ये तब्बल ६ हजार मुलींची स्थळं नाकारली होती.