बॉलिवूड कलाकारांमध्ये वादविवाद होतच असतात. कधी सेटवर भांडणं, पार्ट्यांमध्ये वाद, अभिनेत्रींमधील कॅटफाइट अशा विविध घटना समोर येतच असतात. सध्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या रणवीर सिंगचा असाच एक वाद चर्चेत आला आहे. खुद्द निर्माता दिग्दर्शक करण जोहरनेच हा किस्सा सांगितला आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या कार्यक्रमात परीक्षक असलेल्या करणने हा प्रसंग प्रेक्षकांना सांगितला. भांडणं झाल्यावर मनधरणी करण्यात कोणता कलाकार स्वत:हून पुढाकार घेतो, असा प्रश्न एका चाहत्याने त्याला विचारला. यावर क्षणाचाही विलंब न करता त्याने रणवीर सिंगचे नाव घेतले. ‘अगदी क्षुल्लक कारणावरून मी त्याच्यावर चिडलो होतो. त्यानंतरही जेव्हा आमची भेट झाली तेव्हा अत्यंत आनंदाने समोर आला. ‘टू स्टेट्स’च्या स्क्रिनिंगदरम्यान आम्ही एकमेकांना भेटलो. मला पाहिल्यावर क्षणाचाही विलंब न करता स्मितहास्य करत तो माझ्याकडे आला. तू माझ्यावर नाराज होऊ शकत नाही, असे म्हणत त्याने मला मिठी मारली,’ असे त्याने सांगितले.

वाचा : कास्टिंग काऊचबद्दल मंदिरा म्हणते, टाळी एकाच हाताने वाजत नाही

‘पद्मावत’ चित्रपटाला मिळणारे यश पाहून करणने ट्विटरवरूनही रणवीरला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या दोघांमधील वाद आता पूर्णपणे मिटला असं म्हणायला हरकत नाही. करण जोहर आणि रणवीर आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी एकत्र काम करणार आहेत. रोहित शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.