आपल्या देशात लोकशाही आहे. घटनने प्रत्येकाला बोलण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिला आहे. मात्र एखाद्याचे म्हणणे पटत नाही म्हणून हिंसाचाराच्या माध्यमातून अभिव्यक्त होणे चुकीचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे मत मत शोध मराठी मनाचा २०२० संमेलनाचे अध्यक्ष सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकासमंच व सेंटर फॉर ट्रान्सफॉरिमग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनपी नाटय़गृहामध्ये शोध मराठी मनाचा २०२० हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या शेवटच्या सत्रात नगराज मंजुळे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रत्येकाला बोलू दिले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. त्याची बाजू समजून घेतली पाहिजे. दडपून टाकणे योग्य नाही. दडपण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा कधीतरी विस्फोट होतो. भावनांचा उद्रेक होऊन त्या मार्ग बदलतात, असे म्हणत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले. आपल्या देशात जातिव्यवस्था अजूनही टिकून आहे. थोडाथोडा बदल होतोय पण या बदलाचा वेग मंद आहे. ग्रामीण भागत आजूनही जातीयता आहे. जातीवरून आजही हिणवले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये असणारे हिरो दिसायला सुंदर होते. जो दिसायला कुरूप तो खलनायक अशी विभागणी होती. चित्रपटातील जग स्वप्नाळू होते. मला हे बदलायचे होते. म्हणून मी वेगळे विषय निवडून चित्रपट केले. वास्तव मांडण्याचा प्रयत्न मी केला. चित्रपटातून सामाजिक प्रश्न मांडले गेले पाहिजेत असे मंजुळे यांनी सांगितले. प्रत्येक गोष्ट पशानेच होत असे नाही. तुमच्याकडे कौशल्य, प्रेरणा व मेहनत करण्याची क्षमता असेल तर तुम्ही यश मिळवू शकता. शाळेत जा, शिका. वाचन करा. शाळेच्या बाहेरही बरेच काही शिकता येते, त्यातून शिका, असा सल्ला त्यांनी या कार्यक्रमासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दिला.