करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. आता हळूहळू अनलॉक करण्याची प्रक्रिया केली जात आहे. तसेच सरकारने मालिका आणि तित्रपटांच्या चित्रीकरणासही परवानगी दिली होती. पण त्यासाठी नियमावली आखण्यात आली होती. आता मालिकांचे नवे एपिसोड पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आता झी टीव्हीवरील मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

१३ जुलै पासून झी टीव्हीवरील कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, तुझसे है राबता, गुड्‌डन, इश्क सुभान अल्हा, कुर्बान हुआ या मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लॉकडाउन आधी मालिकांचे जे कथानक होते तेथूनच पुढे मालिका सुरु होणार की मालिकांमध्ये नवे वळण येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबईमध्ये जून महिन्यात मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणास परवानगी देण्यात आली होती. पण चित्रीकरण करताना योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारने नियमावली आखली होती. त्यामुळे निर्मात्यांसमोर मोठे आव्हान होते. पण मालिकांचे आता नवे भाग पाहायला मिळणार असल्यामुळे चाहते फार आनंदी आहेत.