अक्षय कुमारचा पहिला वहिला तामिळ चित्रपट 2.0 हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षयनं पहिल्यांदाच रजनीकांत यांच्यासोबत काम केले आहे. काही महिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतर अक्षय तिथल्या कामाच्या पद्धतीवर खूपच खूश झाला आहे. विशेष म्हणजे इथल्या लोकांची वेळं पाळण्याची सवय अक्षयला खूपच आवडली. संपूर्ण बॉलिवूडनं त्यांच्याकडून आवर्जून शिकलंच पाहिजे असंही अक्षय म्हणाला.

तांत्रिकदृष्ट्या ते आपल्यापेक्षाही खूप पुढे आहेत. त्यांचा दृष्टिकोन नेहमीच व्यावसायिक असतो. जर एखादं चित्रिकरण सकाळी ७.३० ला सुरू होणार असेल तर ते तंतोतत त्याच वेळेला सुरू होतं. इथे काम करणारा व्यक्ती छोटा असो की मोठा तो आपल्या वेळा पाळतोच. अगदी सूपरस्टारदेखील वेळेवर येतात. वेळेचं महत्त्व त्यांना बॉलिवूडपेक्षा चांगलं ठावूक आहे.

इथे कोणालाच गृहित धरलं जात नाही प्रत्येक माणसाला ते महत्त्व देतात. वेळ पाळण्याच्या सवयीमुळेच त्यांची कामं खूपच वेगात होतात. जिथे बॉलिवूडमध्ये दिवसाला १० ते १२ शॉट कसेबसे पूर्ण केले जातात तिथे ही लोक दिवसाला ४० दृश्य सहज चित्रित करतात. याच गोष्टीची कमी बॉलिवूडमध्ये आहे. असं म्हणत अक्षयनं 2.0 च्या प्रमोशनदरम्यान टॉलिवूडची एक चांगली बाजू उघड केली.

महानायक अभिताभ बच्चन आणि काही मोजके कलाकार सोडले तर बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीचे कलाकार चित्रिकरणाच्या वेळी ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराच येतात अशी तक्रार वारंवार ऐकायला मिळते. मात्र बॉलिवूडनं आता वेळ पाळणं शिकायलाच पाहिजे असं अक्षय म्हणाला.