भक्ती परब

बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये कतरिना कैफचं नाव आवर्जून घेतलं जातं. गेल्या दोन-तीन वर्षांत खासकरून अभिनेता रणबीर कपूरबरोबरचे संबंध बिघडल्यानंतर तर कतरिनाने ग्लॅमरच्या झोतापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले. ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात तिने केलेल्या स्टंट्सचे चांगलेच कौतुक झाले. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटातून ‘सुरय्या’ म्हणून वेड लावणारी कतरिना आगामी ‘झीरो’ आणि ‘भारत’ या चित्रपटातून दिसणार आहे. त्या निमित्त..

हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीला चाचपडत पावलं टाकणाऱ्या कतरिनाला २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नमस्ते लंडन’ चित्रपटानं बॉलीवूड अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. ‘जसमीत’ (जॅझ)ची व्यक्तिरेखा तिला तिच्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटली. चित्रपटात भिरभिरत्या निरागस नजरेने अभिनेता अक्षय कुमारकडे (अर्जुन) पाहत बोलणारी ‘जॅझ’ अनेकांच्या स्मरणात आहे. आपल्या भूमिकांविषयी मोजकंच बोलणारी कतरिना अलीकडे आपल्या भूमिकांविषयी भरभरून बोलत असते. ती म्हणाली तिला दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. ‘तनू वेड्स मनू’, ‘रांझणा’ चित्रपट पाहिल्यावर तिला त्यातल्या नायिकेच्या व्यक्तिरेखा आवडल्या. आनंद यांच्या चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा कळसूत्री बाहुलीसारख्या किंवा नुसत्याच नायकाच्या अवतीभोवती फिरणाऱ्या नसतात. तर त्यांना त्यांची स्वत:ची अशी ओळख असते, म्हणूनच त्यांच्याकडून ‘झीरो’ चित्रपटाविषयी विचारणा झाल्यावर लगोलग होकार दिला. या चित्रपटात अभिनेत्री बबिताची व्यक्तिरेखा मी साकारली आहे.

‘जब तक है जान’ चित्रपटानंतर कतरिना सहा वर्षांनी शाहरुखबरोबर काम करतेय. यशराज प्रॉडक्शनचा हा चित्रपट त्यावेळी तिच्यासाठी एक आव्हान होतं आणि यश चोप्रांच्या मार्गदर्शनाखाली तिने ही भूमिका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करतानाचा आनंद अनुभवणाऱ्या कतरिनाला तिची आणि शाहरुखची पहिली भेट आठवते. एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात मी शाहरुखला पहिल्यांदा भेटले. त्यानंतर थेट ‘जब तक है जान’ च्या सेटवरच आम्ही भेटलो. ‘जब तक है जान’ हा खास यश चोप्रांच्या शैलीतील प्रेमपट होता. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याआधी त्यांचे चित्रपट, त्यांच्या नायिका याबद्दल तपशीलवार अभ्यास केला. आता ‘झीरो’मध्ये काम करताना पुन्हा भूमिकांचा अभ्यास आणि ते साकारण्यासाठीची मेहनत ही प्रक्रिया अनुभवली. अनुष्का, शाहरुख आणि मी.. आम्हाला तिघांनाही आपापल्या व्यक्तिरेखा साकारताना खूप लक्ष द्यावं लागलं. कारण या तिन्ही भूमिकांना विविध पैलू होते. त्या सरधोपट नव्हत्या.

‘झीरो’ चित्रपट तिला आजवरच्या चित्रपटांपेक्षा वेगळा वाटतो. त्याचे कारण स्पष्ट करताना ती म्हणाली, समानता ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. तुमच्यामध्ये असलेल्या भावनिक, शारीरिक, मानसिक कमतरतांची टोचणी मनाला लावून घेऊ  नका. तर त्यावर मात करत आयुष्य भरभरून जगा, असं हा चित्रपट सांगतो. ‘जिंदगी काटनी नही है, जिनी है..’ हे या चित्रपटाचं सार आहे. आणि हे चित्रपटातून, आमच्या भूमिकांमधून कसं उलगडत जाणार आहे ते दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी आम्हा तिघांनाही खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं होतं. २००५ साली बॉलीवूडमध्ये पदापर्ण केल्यापासून ते आजवरच्या प्रवासातील दिग्दर्शक, सहकलाकार यांच्याकडून प्रत्येकवेळी नवं काही शिकले. सगळ्यात जास्त मार्गदर्शन अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याकडून मिळालं. अक्षय कुमारबरोबर आठ चित्रपटांमध्ये काम केलं असून तो सहकलाकार म्हणून मी जशी आहे तसं मला स्वीकारतो. तू अमूक कर, तमूक कर असे सल्ले देत नाही. त्यामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली. आम्ही बरीच र्वष एकत्र काम केलं नाहीये, पण तरीही आमची मैत्री तितकीच दृढ आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफरसुद्धा मला अभिनेत्रीपेक्षा जवळची मैत्रीण मानतो. सेटवर आल्यानंतर माझ्याशी नेमकं काय बोलायचं आहे, माझा कामाचा मूड आहे का किंवा काही बिनसलंय या सगळ्या गोष्टी त्याला मी न बोलताही सहज समजतात आणि त्यादृष्टीने तो माझ्याशी संवाद साधतो. कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात एक समजूतदार नातं असेल तर ते चित्रपटातही झळकतं. कबीर खान, अनुराग बासू आणि आनंद एल. राय या दिग्दर्शकांबरोबर असंच नातं जोडता आलं. त्यांच्याकडून शिकता आलं असल्याचं तिनं एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

मी ज्यावेळी चित्रपटसृष्टीत आले तेव्हा आत्ताच्या इतकी समाजमाध्यमे नव्हती. आता ही माध्यमे फोफावली असून त्यांचे आमच्यावर कायम लक्ष असतं. समाजमाध्यमांचे परिणाम कलाकारांवरच होतात असे नाही तर तरुण पिढीवरही त्यांचा विपरीत परिणाम होतो. समाजमाध्यमांमुळे विविध मानसिक आजार आणि असुरक्षिततेची भावना तरुणांमध्ये बळावत चालली असून हे घातक आहे. हे परिणाम टाळण्यासाठी जाणीवपर्वूक काही प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना समाजमाध्यमांतून हाय, हॅलो करण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष भेटा, बोला. त्यांच्यात मिसळून एकत्र आयुष्याचा आनंद कसा घेता येईल, यावर भर दिला पाहिजे, असंही कतरिना आवर्जून म्हणाली.

साधं राहावंसं वाटतं!

समाजमाध्यमं आणि ग्लॅमरविश्व दोन्हीचं दडपण घेऊन वावरणं तिला अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच या दोन्ही गोष्टींपासून ती अंतर राखून आहे. कतरिनाला सतत ग्लॅमरस राहायलाही आवडत नाही. तिला चित्रपटांव्यतिरिक्त इतर वेळी इतरांसारखंच साधं राहावंसं वाटतं. मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला, त्यांच्यात रमायला आवडतं. तेव्हा तर मला अगदी साधे कपडे घालून फिरायचीही इच्छा असते. मात्र हल्ली समाजमाध्यमांमुळे ते शक्यच होत नाही. जिथे जाऊ  तिथे सतत कॅमेऱ्याची नजर आमच्यावर असते. त्यामुळे इच्छा असूनही तसं राहता येत नाही, वागताना-बोलताना जपून राहावं लागतं, अशी खंतही तिने व्यक्त केली.

भूमिकेच्या बाबतीत मी पूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून असते. एखाद्या व्यक्ति रेखेतून दिग्दर्शकाला काय अपेक्षित आहे? एखादे दृश्य नेमकं काय देऊन जाणार आहे? अशा छोटय़ा-मोठय़ा गोष्टींबाबत दिग्दर्शकांशी बोलून त्यावर काम करायला आवडतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

-कतरिना कैफ