लॉकडाउनच्या अटी शिथील केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावरील मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यात आता बाळूमामाच्या नावनं चांगभलं या मालिकेच्या चित्रीकरणासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच आता प्रेक्षकांना या मालिकेतील पुढील आणि नवीन भाग पाहायला मिळणार आहेत. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. बाळूमामांच्या प्रपंच, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना मालिकेतून घडत आहे. बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेचे नवे भाग येत्या २१ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आखून दिलेले नियम आणि अटी यांचं पालन करुन या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. सेटवर योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. “इतिहासात पहिल्यांदाच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील काम ठप्प झालं होतं. परंतु, सरकार, टिव्ही वाहिन्या, निर्माते यांच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. सध्याची परिस्थिती दक्ष राहण्याची असल्यामुळे सेटवर प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ हे योग्यती काळजी घेत आहेत, असं मालिकेचे लेखक, दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले.