माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर ९० च्या दशकातील प्रसिद्ध जोडी होती. माधुरी आणि अनिल कपूरची जोडी म्हणजे चित्रपट हिट असं समीकरणच जुळलं होतं. ‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘बेटा’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये ही जोडी झळकली होती. टोटल धमाल चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी बऱ्याच वर्षानंतर प्रेक्षकांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळाली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, एक वेळ अशी आली होती जेव्हा माधुरीने अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.

आपल्या जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या जोडीमध्ये नेमकं असं काय झालं होतं ? काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या हिट चित्रपटांचा नंबर वाढत असताना सोबतच अफवाही तितक्याच उडत होत्या. दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही जवळचं नातं असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरु झाली होती. अनिल कपूर आणि माधुरी बराच वेळ सोबत घालवत असल्याचीही चर्चाही यावेळी रंगली होती.

मीडिया रिपोर्टसप्रमाणे, एके दिवशी अनिल कपूर यांची पत्नी सुनिता मुलांना घेऊन सेटवर पोहोचली होती. माधुरी यावेळी लांब उभी राहून अनिल कपूरला आपल्या कुटुंबासोबत बोलताना पाहत होती. असं म्हणतात की त्याच वेळी माधुरीने आपण पुन्हा कधी अनिल कपूर यांच्यसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन दोघांमध्येही एक अंतर कायम राहील.

माधुरी दीक्षितने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, आपण अशी कोणतीच गोष्ट करणार नाही ज्यामुळे अनिल कपूरच्या कुटंबावर त्याचा प्रभाव पडेल. या मुलाखतीत माधुरीने आपल्यात आणि अनिलमध्ये मैत्री वगळता कोणतंच नातं नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. अनिल कपूर अतिसंवेदनशील असून आपल्याला अत्यंत शांत स्वभावाचा पती हवा होता असं माधुरीने म्हटलं होतं. अनिल कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असल्याने आपण मस्करी किंवा कोणत्याही विषयावर चर्चा करणं सोपं पडतं असंही माधुरीने सांगितलं होतं.